Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३९१

पृष्ठ १८९: बाजीराव राज्यावर होता तेव्हा... स्त्रिया भ्रष्ट
 दुसरा बाजीराव केवळ कलावंतिणींच्याच नादी लागलेला होता असे नव्हे, तर चांगल्या कुलीन स्त्रियांच्याही मागे लागला होता हे त्याने दिलेल्या बक्षिसांच्या नोंदीवरून दिसून येते. बायकांच्या घोळक्यात काळ घालविल्याशिवाय व रासवट विदूषकी चाळे केल्याशिवाय, इतकेच नव्हे तर किळसवाणे व्यभिचार पाहिल्याशिवाय, त्याचा एक दिवस जात नसे. त्याच्या वाड्यात येणाऱ्या बायका बहुधा थोरामोठ्यांच्या घरातील असत आणि जे सरदार आपल्या घरांतील स्त्रिया वाड्यात पाठविण्यास खळखळ करीत त्यांच्यावर बाजीरावाचा अनावर संताप होई. खंडेराव रास्त्याने आपल्या घरातील बायका वाड्यात पाठविण्यास नकार दिला याच कारणामुळे बाजीरावाने त्याचा काटा काढला आणि माधवराव रास्त्याचा त्याने जो दीर्घकाळ छळ केला त्याच्याही मुळाशी बहुधा हेच कारण असावे. बापू गोखल्यावर प्रथम बाजीरावाचा राग होता आणि नंतर तो राग मावळून त्याच्यावर बाजीरावाची बहाल मर्जी बसली याचे कारण बापू गोखल्याने आपल्या घराची बेअब्रू होण्यास संमति दिली हेच होते असे माहितगार लोक बोलत असत. एलिफिन्स्टनच्या लिखाणात व त्याच्या कृष्णाजी बल्लाळ गोडबोले लिखित चरित्रात याविषयीचे उल्लेख मिळतात. (डॉ. रा. शं. वाळिंबे यांच्या 'महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना' या ग्रंथावरून. पृष्ठे ३१-३२)

पृष्ठ १९५: यास आधार शांडिल्याची स्मृति
 शांडिल्य हा अश्वलायन सूत्रातील गोत्रांच्या यादीत असून शांडिल्य सूत्रे भक्तिज्ञानाविषयी आहेत. एक स्मृति, धर्मसूत्र व तत्त्वदीपिका शांडिल्याच्या नावावर आहे.

पृष्ठ १९५: विशिष्टाद्वैत
 रामानुजाचार्यांनी प्रतिपादिलेले वेदान्तमत. शंकराचार्यांचा मायावाद आणि अद्वैतसिद्धान्त ही दोनही खरी नसून जीव, जगत व ईश्वर ही तीन तत्त्वे जरी भिन्न असली तरी जीव (चित) व जगत (अचित) ही दोनही एका ईश्वराचेच शरीर असल्यामुळे चित- अचित- ईश्वर एकच होय. शरीरातील या सूक्ष्म चित-अचित यापासून पुढे चित-अचित किंवा अनेक जीव व जगत निर्माण होतात. ब्रह्म हे अद्वैत खरे, परंतु केवळ अद्वैत नव्हे तर विशिष्ट अद्वैत होय.