Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३९२ : शतपत्रे

पृष्ठ २०१: जेवणापलीकडे त्यास कर्तव्यच राहिले नाही
 या संदर्भात १८६८ सालच्या ना. वि. जोशी लिखित 'पुणे वर्णना'तील पुढील उतारा लक्षणीय आहे-
 "या वेळच्या लोकांची स्थिती म्हटली म्हणजे अशी होती की, सुग्रास खावे आणि रिकामटेकड्या गप्पा मारीत बसावे. माहिती म्हटली म्हणजे इतकीच की, इंग्रज हा कलकत्ता म्हणून एक बेट आहे तेथील राहणारा. याहून विशेष माहिती म्हटली म्हणजे ब्राह्मणभोजनास किती शेर तूप लागते, उन्हाळ्यात किती पायल्यांचे पुरण, पावसाळ्यात किती पायल्यांचे, हिवाळ्यात किती पायल्यांचे, याप्रमाणे कोशिंबिरी- भाज्यांचा सुद्धा सारखा बेत उरकण्याजोगा तोलाने सांगत. याचे नेहमी संभाषण म्हटले म्हणजे विशेषेकरून जेवणाविषयी व ग्रामण्याविषयी असावयाचे. त्यांची विद्या दोन प्रकारची होती एक कारकुनी व दुसरी याज्ञिकी.
 "शूरत्वाविषयी म्हणावे तर ते लोकांत अगदी नव्हते. पाचशे वर्षांपूर्वीच्या लोकांची आणि आताच्या लोकांची जर शूरत्वाविषयी तुलना करून पाहिली तर शेवटील बाजीराव येईपर्यंत त्यांच्यात काहीतरी शौर्य होते. परंतु बाजीरावाने लोकांस अगदी नादान करून विषयनिमन करून सोडले; पराक्रमहीन, निर्लज्ज, दुर्गुणी, स्त्रैण, मूर्ख, अशक्त, उन्मत्त, कपटी, अविश्वासू, स्वहित न जाणणारे, दूरदृष्टिहीन, आळशी, पुष्कळ खाणारे असे केले. पराक्रम, विद्या, सावधान या गुणांचे मौल्य अगदी गेले. ऐषआरामाच्या बाबी वाढल्या. साखरभात खाणारास मान व मौल्य आले. राज्याचा बंदोबस्त गेला. आणि जसे एखादे घर सर्व ठिकाणी कुजके, पडीत, खिळखिळे होते, तसे राज्य झाले; तेणेकरून प्रभू राज्यभ्रष्ट होऊन धुळीचे दिवे खात गेले." (पृ. ७०) याच 'पुणे- वर्णना'त 'ज्ञानप्रकाशा'तील एक उतारा- असाच बाजीरावकालीन- पुण्यातील समाजस्थितीवर प्रकाश टाकणारा देण्यात आला आहे. जिज्ञासूंनी डॉक्टर वाळिंबे यांच्या 'महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना' या पुस्तकातून (पृ. ३७-३८) तो वाचावा. ('पुणे वर्णन' हे पुस्तक अतिदुर्मिळ आहे.)
 उदरपरायण, भोजनभाऊ ब्राह्मणांवर लोकहितवादींनी अनेक ठिकाणी कोरडे ओढले आहेत. त्याचे करणे अस्थानी नव्हते हे लक्षात यावे एवढ्यासाठीच दीर्घ उतारा येथे उद्धृत केला आहे.