Jump to content

पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३७४ : शतपत्रे

 हे ईश्वरही करणार नाहीच. कारण की, अशा अघटित घटना होणे त्या माणसांच्या कृतीने होत नाहीत; ईश्वरसत्तेने होतात. जेव्हा हिंदू लोकांचा मूर्खपणा जाईल तेव्हा ईश्वर इंग्रजास या देशातून जाण्याची आज्ञा करील. जेव्हा ज्वर जातो तेव्हाच मुखास रुची येते. असा प्रकृतीचा स्वभाव आहे. ही गोष्ट त्वरित सिद्धीस जाणार नाही. हिंदू लोक आज आंधळे आहेत. ते डोळस व्हावयास काय उपाय करावे? हे कळविणे योग्य आहे. असे जाणून हिंदू लोक जे आपले स्वदेशीय परमप्रिय होत, त्यांस मी उपदेश करतो. हा त्यांनी लक्षात आणावा. माझी निश्चयरूप खात्री आहे की, असे लोक झाल्याशिवाय हे लोक कदापि सुधारणार नाहीत.
 हे कोणते म्हणाल, तर प्रथम ज्ञान मिळविणे. ते ज्ञान कोणते, वेदांचे ज्ञान नव्हे. स्वधर्मसंबंधी जी पुस्तके आहेत, त्यातील सारांश व जो बोध साधुसंत इत्यादी लोकांनी सारासार विचार करून सांगितला आहे. त्यावरून ईश्वराची दृढ भक्ती व पवित्र अंतःकरणाने ध्यान करावे. हे ज्ञान प्रथम पाहिजे. हे या लोकांस नाही. कोणी ढोंगाने देवपूजेची भांडी मांडून सकाळी प्रहरभर पूजा करीत बसतो; परंतु देवाविषयी त्यांस लेशभर ज्ञान असेल तर शपथ! अंतःकरण पवित्र नाही, नीती नाही. केवळ ढोंगी गारुड्याचे जसे पेटारे असतात, तद्वत् ते संबळ्या मांडून बसतात, तर असा प्रहर दोन प्रहर बसून वेळ घालवला, तर उपयोग काय? त्यात ईश्वराची पूजाही झाली नाही, उद्योगही झाला नाही. केवळ तो आयुष्याचा वेळ व्यर्थ मेला असे जाणावे.
 हिंदू लोक हे धर्म म्हणून किती उपद्व्याप करतात, याचा ठिकाण नाही, कोणी जन्मापासून लुच्चा, लबाड, नित्य घरे बुडविणारा व खोटी शपथ करणारा असतो; परंतु सकाळी उठून बागेत जाऊन स्वहस्ताने तुळशी तोडून नेमाने आणतो. हा नेम कधी टळत नाही. तसे अग्निहोत्री हे नाना प्रकारच्या खटपटी करतात. विस्तव पेटवून त्याचे आराधनेत वेळ घालवितात; परंतु त्यांचे अंतःकरणाची शुद्धता नसते, व त्यांस नीती नसते. त्यांचे आयुष्य केवळ कर्मठपणात जाते. यास्तव त्यांच्याने दुसरा काही उपयोग घडत नाही. यांस एक आणि दोन किती म्हणून पुसले, तर तीन समजत नाहीत. व्यवहारातील त्यांस गम्य नसते. लोक त्यांस पवित्र समजतात आणि पैसा देतात; म्हणून त्यांचे रक्षण होते. नाही तर ते कशाचे उपयोगी नाहीत. लोकांस उपयोगी त्यांच्याने काही व्हावयाचे नाही.
 असेच भट व शास्त्री हे तर महामूर्ख होत. गोंधळी बरे, पण शास्त्री अधिक मूर्ख. त्यांस लिहिता येत नाही; वाचता येत नाही; व्यवहार कळत