पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १५७

 कोणी म्हणतो, मी कार्तिकमासी निरांजने दिली; कोणी म्हणतो, मी वैशाखात मडकी दिली, आवळे दिले, हा धर्म कशाचा? हा मूर्खपणा आहे. भटांनी वेड लावावे आणि गृहस्थांनी त्याचप्रमाणे नाचावे. यजमानास सांगावे की, उष्णकाळी क्षीरभोजन करावे, म्हणजे यजमान पुण्य जाणून तसे करितो. पण वास्तविक यामध्ये पुण्य कशाचे ? आळशी लोक द्रव्य खाऊन जातात. आणि मालकास पुण्य पुण्य म्हणून ठकवितात, इतकेच आहे. वास्तविक पुण्य हेच की, यथायोग्य पात्र पाहून धर्म करावा. तान्हेला आहे त्यांस पाणी द्यावे. कुंभ भरून ब्राह्मणास दिला व त्याने तो जाताना टाकून दिला, कारण त्याचे घरी हौद आहे व विहीर आहे. मग त्याला यजमानाच्या कुंभातील पाण्याचे काय करावयाचे आहे ? अर्थातच तो ते मडके ओतून टाकतो. तेव्हा हा धर्म कसा ? परंतु हाच धर्म आहे, असे जे म्हणतात ते मूर्ख नव्हत काय ?

♦ ♦


स्नान-संध्या

पत्र नंबर ३६ : २६ नोव्हेंबर १८४८

 वास्तविक धर्म सोडून व ईश्वराची भक्ती सोडून हिंदू लोक विलक्षण मार्गास लागले आहेत. ते असे की, किती एक लोक स्नानसंध्यादि कर्मे करतात. त्यांस वाटते की, मोक्षाचे साधन हेच आहे. प्रातःकाळी उठून स्नानसंध्या करावयास बसून, डोकीस रुद्राक्षांच्या माळा घालून, भस्मलेपन करून, ढोंग करून, चार घटका बसावे म्हणजे त्यात ईश्वराची भक्ती झाली. मग सर्व दिवस वाईट कर्मे व असत्य भाषणे करून, लोकांच्या माना मुरगाळाव्या, तरी चिंता नाही. परंतु आम्हास असे वाटते की, हे स्नानसंध्या करणारे आपले आयुष्य व्यर्थ घालवितात, त्यात काही ईश्वरप्राप्ति नाही. ते बकध्यानी, मूर्ख व ढोंगी आहेत. असे म्हटले आहे की,

यं मां सेवेत सततं न नित्यं नियमान्बुधः ।
मान्यतत्त्वं कुर्वाणो नियमान् केवलान् भजन् ॥

(मनु. अध्याय ४ श्लोक २०४)


परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ।

(व्यास)