पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०० : शतपत्रे

 संस्कृतांत ग्रंथ बहुत आहेत. पहा की, एकट्या व्यास कवीने अठरा पुराणे व अठरा उपपुराणे, शिवाय सूत्रे लिहिली. तेव्हा हजारो व लक्षावधी श्लोकांचे एक पुराण अशी किती एक लिहिली. तेव्हा एवढे काव्य करण्यास त्याने केवढी मेहनत केली असेल ? आणि किती एक वर्षे घालविली असतील ? तसेच अलीकडे व्याकरणावर व धर्मशास्त्रावर निर्णयसिंधू, मनोरमा, कौमुदी इत्यादीक मोठाले ग्रंथ ज्या पंडितांनी लिहिले, ते पंडित आतांचासारखे असते, तर न लिहिते, हे उघड आहे व आता विद्येची माती होत आहे. हेच अनुमान खरे की प्राचीन राजे हे विद्वानांस मोठा आश्रय देत होते, म्हणजे ते आपला जन्म त्यात घालवून योग्यता मिळविण्याकरिता श्रम करीत होते. अस्तु.
 तो काळ आज पाहिजे होता व इंग्रज लोकांची विद्या तशात यावयाची होती. म्हणजे फारच चमत्कार होऊन त्या विद्येची कदर सर्व लोकांनी केली असती; परंतु जे गेले ते येत नाही. यास्तव सांप्रत आहे त्याजविषयीच आपण नजर पुरवावी हे बरे. हल्ली श्रीमंत लोक व विद्वान लोक विद्येचे शत्रू झालेले आहेत व विद्येशी अपरिचित होऊन भलत्याच कामास विद्या म्हणून आणि वेद पाठ करणारे मूर्ख भट यांस विद्वान असे समजतात. इतका अंधार या देशांत झाला आहे. सांप्रत काळी फक्त वेद पाठ करतात आणि तो उलटासुलटा म्हणतात. क्रमपाठी तीन तीन वेळा तीच अक्षरे म्हणतात; परंतु या कार्यास विद्या कोण म्हणेल? यापेक्षा रस्त्यावर मजुरी करतात ते लोक बरे.
 पण भट फार अमंगळ व अनर्थास विद्या म्हणतात. अहो, विद्या या शब्दाचा अर्थ तरी काय होतो, तो पहा ! पाठ म्हणणे ही विद्या केली कोणी ? यात फळ काय ? हा मूर्खपणा उत्पन्न कसा झाला असेल तो असो ! परंतु एवढा मूर्खपणा कधी कोणत्याही देशांत झाला नसेल. लोक असे समजतात की, श्राद्ध, पक्ष, हव्य, कव्य, श्रावणी, लग्न, मुंज, संस्कार इत्यादी कर्मात भट पाहिजेत; परंतु भट जर विद्वान होतील व हे पाठ म्हणणे सोडून देतील, तर त्यांच्याने श्राद्धे होणार नाहीत काय ? पाठ म्हणणारे मूर्ख, यांस धर्मादाय करावा. ते वेद म्हणतात आणि जाग्रणे करतात परंतु जसे गुजराथी लोकांत मजूरदारांकरवी शोक करवितात, तद्वत हे भट मजूरदार अक्षरे मात्र म्हणतात. यांचे अंतःकरणास काही भेद होत नाही. परकी ढोंग करून रडतात, ते रडणे कोणी मायेचे म्हणेल काय ? तद्वत् पाठ म्हणतात, यास कोणी देवांची स्तुती करतात, असे म्हणावे की काय ?
 परंतु किती एक लोक मूर्ख असे आहेत की, वेदपाठास पैसा देतात व म्हणणारास आणि ऐकणारास काही समजले नाही तरी धन्य मानून धर्म