पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ९७

 जर योगशास्त्र खरे असते, तर नाहीसे का होते ? लोक अवश्य योग करते. कारण ते मोठे सुख आहे; परंतु ही गोष्ट किमयेप्रमाणे व्यर्थ आहे. म्हणून या अशा वक्त्यावर भरवसा ठेवू नये. नीट अर्थ करीत जावा आणि विद्येचे दुसरे भाग मात्र घ्यावे आणि भविष्य ज्योतिष टाकून द्यावे. हिशेबांचे मात्र ज्योतिष घ्यावे, हे बरे. यथानीती वर्तणूक केली, म्हणजे त्यात मोक्ष आहे. हजार आचारांच्या खटपटी केल्या, तरी त्यात काही नाही आणि शास्त्राचा अर्थ युक्तीने घेतला पाहिजे. याविषयी वाक्य -

श्रुतिस्मृतिविरोधे तु युक्तिरेव बलीयसी ।

 या वाक्याने ह्याचा निर्णय होतो. परंतु ज्या दिवशी हिंदू लोक आपल्या बुद्धीचा उपयोग करू लागतील, त्या दिवशी त्यांस हा भेद समजेल.

♦ ♦


संस्कृत आणि इंग्रजी विद्या

पत्र नंबर ६९ : २९ जुलाई १८४९

 लोकांमध्ये अशी समजूत आहे की, शहाणपण हे अंगस्वभावाने येते. परंतु ही जरी थोडीशी खरी गोष्ट आहे; तत्रापि सर्व शहाणपण अंगस्वभावात असते, असे नाही.
 शहाणपण पुष्कळ मिळवावे लागते. लोकांमध्ये समजूत अशी आहे व ज्ञान मिळणे हे संसारकृत्य आहे; याजकरिता किती एक जण इंग्रजी शिकतात. त्यांस लोक पुसतात की, तुम्हांस रोजगार लागला. आता विद्या शिकता कशाला ? शहाणपणा व ज्ञान म्हणजे काय, याचा अर्थच त्यांस कळत नाही. मनुष्याने ग्रंथ वाचले पाहिजेत; पुष्कळ विद्या व भाषा शिकल्या पाहिजेत; म्हणजे बहुत गोष्टी कानावर पडून माहितगारी होते; केवळ संस्कृत वाचूनच होणार नाही. मला निश्चयेकरून वाटते की, ज्यास शहाणपण व ज्ञान मिळवावयाचे असेल, त्याने इंग्रजी भाषा किंवा त्या भाषेतील ग्रंथांचे तर्जुमे तरी वाचावे, म्हणजे त्यांस पुष्कळ गोष्टी कळतील.
 आता इंग्रजी विद्या फार सुधारली आहे. याजमुळे त्यातील भूगोलावर