पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९६ : शतपत्रे

शब्द लोकांचे तोंडात मात्र आहेत; परंतु अर्थ ठाऊक नाही. आणि काही विद्या फारच मूर्खपणास नेऊन पोचविल्या आहेत. त्या कोणत्या म्हणाल तर ऐका.
 एक वैद्यकी. रसायनशास्त्र हे चांगले शास्त्र आहे; परंतु त्यामध्ये या लोकांनी किमया काढली आहे. तसेच ज्योतिषशास्त्र चांगले; परंतु त्याजवरून भविष्ये पाहण्याची रीती व नियम काढले आहेत, ते अगदी खोटे. आकाशातील जे तारे, त्याच्याने पृथ्वीवरचे मनुष्याचे नशिबाचा फेरफार कसा होईल ? शनी पाहिजे तिकडे गेला व गुरु कोणत्याही राशीस आला, तरी मी पृथ्वीवर राहणारा माझे तो काय करील ? व माझ्याशी व त्याशी संबंध काय ? परंतु प्राचीन काळचे भटांनी अडाणी लोकांवर कर बसविण्याकरिता ही युक्ती केली आहे. तसेच नीतिशास्त्र याचे पर्यवसान तप आणि योगशास्त्राकडे गेले आहे; परंतु त्यातही काही अर्थ नाही. शास्त्रकारांनी नीती सांगण्याकरिता ही युक्ती केली आहे. म्हणजे पुरुषास तीन वेळा स्नान वगैरे सांगितले. येणेकरून शास्त्रकाराचा हा हेतू की, त्या पुरुषाचा काळ त्या खटपटीत जाऊन त्याकडून काही दुराचार घडू नये.
 ब्राह्मण चोरी करतील, म्हणून मुळीच द्रव्य बाळगू नये, असे सांगितले. संन्याशी स्त्रीशी जातील, म्हणून त्यांस सांगितले की, तुम्ही घरी राहू नये व दूध वगैरे खाऊ नये. तात्पर्य, त्यांची नीती रक्षण होण्याकरिता इतक्या युक्ती सांगितल्या. तसेच विधवा स्त्रियांचे हाल त्यानिमित्तच आहेत. परंतु नीती स्पष्ट करून सांगते, तर बरे होते. ही इतकी बहूक्ती केली, त्याने लोक मूर्ख झाले. गायनविद्या आहेत. त्यांचा राग अमका चांगला आहे, असे म्हणावयाचे सोडून, या रागाने पाऊस पडतो, त्या रागाने दिवे लागतात, इत्यादी अतिशयोक्ती केली आहे. ती न समजता लोक आता खरेच म्हणतात, आणि म्हणतात की, तशी विद्या कोठेच नाही. आणि मंत्राचे सामर्थ्य गेले; परंतु होते कधी ? कधी नव्हते. ही बहूक्ती आहे. याजवर भरवसा ठेवू नये.
 तसेच, योगशास्त्राची अवस्था आहे. मला असे वाटत नाही की, मनुष्य योगाने हजार वर्षे वाचेल, किंवा प्राण ब्रह्मांडी नेईल आणि सुखदुःखांचा त्याग करील. मग त्यांस तोडला तरी सारखा, मारला तरी सारखा. अशा स्थितीचे वर्णन पुराणात बहुत आहे; परंतु ही स्थिती पुराणांतील इतर गोष्टीसारखीच मला अमानुष व अशक्य दिसते. किंबहुना अतिशयोक्ती असेल. म्हणजे मनुष्याने सुखदुःखाविषयी शांती धरावी, म्हणजे चित्त स्थिर रहाते, हे स्पष्ट लिहिल्यावाचून बळेच अवघड रीतीने लिहिले असेल, हेच अनुमान दिसते.