पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९४ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

 भारताचें सामर्थ्य संरक्षणक्षम आहे याचे एक प्रमाण श्री. काकासाहेब गाडगीळ यांनी १९५९ च्या मे महिन्यांतील पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेंत दिले. ते म्हणाले, "स्वातंत्र्यापूर्वी आपल्याला कोणी विचारीत नव्हतें, पण आता जगांत कोठे हि कांही घडलें तरी आधी दिल्लीची प्रतिक्रिया काय आहे हैं विचारतात." पण काकासाहेबांनी पूर्वार्धच फक्त सांगितला असें वाटतें. तसें विचारून, दिल्लीची प्रतिक्रिया काय आहे तें समजल्यावर नंतर विचारणारे काय करतात, हा जो उत्तरार्ध तो सांगावयाचा राहून गेला असें दिसतें. काश्मीरवर पाकिस्तानचे आक्रमण झालें तेव्हा दिल्लीची प्रतिक्रिया काय तें बड्या राष्ट्रांना समजलें होतें. पाकिस्तानला अमेरिकेने शस्त्रास्त्रे पुरविलीं तेव्हा दिल्लीचें मत काय तेंहि जगाला माहीत झालें होतें. चीनला यूनोंत प्रवेश देण्याविषयी दिल्लीचा अभिप्राय सर्वश्रुत आहे. या दिल्लीच्या अभिप्रायांना जगाने किती मान दिला? दिल्लीच्या प्रतिक्रियेचा खरोखरच जगांतलीं राष्ट्र विचार करीत असती तर हंगेरीवर आक्रमण करण्यापूर्वी रशियाने तिचा सल्ला घेतला असता. इजिप्तवर बाँब फेकण्यापूर्वी ब्रिटन- फ्रान्सनी आणि तिबेट गिळंकृत करण्यापूर्वी नवचीनने दिल्लीची प्रतिक्रिया काय होईल हे समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. तसा प्रयत्न त्यांनी नाहीच केला, पण उलट भारतावरच साम्राज्यवादी, आक्रमक म्हणून उद्दामपणें आरोप करून पंडित नेहरूंनाच पंचशीलाप्रमाणें वागा, असा उपदेश केला. शिवाय नेपाळ, भूतान हे प्रांतहि गिळंकृत करण्याची योजना नवचीनने आखली आहे अशी वार्ता आहे. तेव्हा दिल्लीच्या प्रतिक्रियेला जगांत काय किंमत आहे हें सर्व भारतीयांना आता सूर्यप्रकाशाइतकें स्पष्ट दिसूं लागले आहे. वास्तविक ही भारताची फार मोठी मानहानि आहे, एकट्या दिल्लीची किंवा पंडितजींची नव्हे. आपल्या राष्ट्राला विश्वासांत घेऊन नेत्यांनी हा अपमान का होतो हे जनतेला समजावून दिले पाहिजे व तिच्या राष्ट्रनिष्ठेला चेतविलें पाहिजे. पण तसें न करतां दिल्लीची प्रतिक्रिया काय आहे हें दर वेळीं विचारतात, यांतच आपले मोठे वैभव आहे, यांत आपला गौरव आहे अशी प्रौढी त्यांनी जनतेपुढे मिरवावी ही मोठी खेदजनक गोष्ट आहे.
 पण भारतीय नागरिकांनी असल्या वैभवाला दिपून जाऊं नये.