पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ गीतारहस्याचे तात्पर्य ३३ एखाद्या सत्कृत्याकडे दोन पैसे आणि त्याच कामासाठी एखाद्या लक्षाधीशाने शंभर रुपये दिले तरी त्याची नैतिक योग्यता आम्ही एकच समजतो. यावरून शुद्ध निष्काम व सर्वाभूती सम झालेली अतएव फलासंगविरहित बुद्धि हेच काय ते गीतेत वर्णिलेले सदाचरणाचे मूळ होय असे सिद्ध होते. ' पत्र पुष्पं फलं तोय' याचा भावार्थ हाच असून अशा रीतीने जो आपले कर्तव्य करतो त्यास कर्माचे बंधन न लागता स्वधर्माने लोकसंग्रह केल्याचे श्रेय संपादन करून त्याच कर्माने अखेर त्यास मोक्ष मिळतो म्हणून मोक्षासाठी साधन म्हणूनच नव्हे तर ज्ञानो- त्तरहि निष्काम कर्म अवश्य केली पाहिजेत असे गीतेचे पुनः पुनः सांगणे आहे व याचमुळे अखेर स्वधर्माप्रमाणे युद्ध करण्यास अर्जुन प्रवृत्त झाला आहे. भक्तिमार्ग वर जी बुद्धीची निष्काम अवस्था वर्णन केली ती अध्यात्मविचाराने प्राप्त होते हे खरे. पण ती सिद्ध होण्यास अध्यात्मविचार हा मार्ग क्लेशमय असून भक्तिमार्गाने तोच हेतु सुलभ रीतीने प्राप्त होतो. आणि हा मार्ग प्रत्यक्ष असल्या- मुळे त्याचे आचरणहि सुखाने घडते असे गीतेचे यापुढे दुसरे महत्त्वाचे सांगणे आहे. पण यावरून निष्कामकर्मविरहित भक्तीच गीतेत प्रतिपाद्य आहे असे होत नाही. भक्ति हे साधन आहे. साध्य नव्हे. व सर्व साधनात हे साधन जरी सुलभ असले तरी त्याने निष्काम व समबुद्धि संपादन करून कर्मे सोडावी असे सिद्ध न होता उलट त्या बुद्धीने जगातील सर्व व्यवहार करीत रहावे हेच गीतेचे अखेरचे सांगणे आहे. याने मोक्षप्राप्ति होते इतकेच नव्हे तर जगातील सुस्थितिहि कायम रहाते. यासच ज्ञानकर्म - समुच्चयपक्ष असे म्हणतात व तोच गीतेतील प्रतिपाद्य विषय होय. केवळ म्हणजे कर्मत्यागपूर्वकज्ञान किंवा केवळ भक्ति हे गीतेतील अंतिम ध्येय नव्हे. हा ज्ञानकर्म - समुच्चयपक्ष गीतेतच नव्हे तर ईशावास्यादि उपनिषदात वर्णिलेला आहे. किंबहुना गीता हे मोक्षदृष्ट्या संसार कसा करावा याचे शास्त्र आहे. संसार सोडून देण्यासाठी गीता सांगितलेली नाही. आधुनिक पाश्चिमात्य पंडित आपली संसारशास्त्रे केवळ आधिभौतिक पायावर रचीत असतात. पण हा पाया अपुरा असल्यामुळे तो सोडून देऊन संसारशास्त्राचा मोक्षशास्त्राशी म्हणजे अध्यात्मशास्त्राशी गीतेने उत्तम मेळ घालून दिला आहे. गीतेत जर काही अपूर्वता असेल तर ती हीच होय. नुसता वेदांत किंवा नुसती भक्ति प्रतिपादन करणारे ग्रंथ पुष्कळ आहेत. पण त्यातून प्रायः अखेर कर्मसंन्यासरूपी चतुर्थाश्रम प्रतिपादिलेला असतो. पण गीतेचा कटाक्ष तसा नाही. संन्यास या शब्दाचा अर्थ व्यापक करून कर्माचा संन्यास न करिता फळाचा संन्यास करा किंवा संन्यास बुद्धीत ठेवून केवळ इंद्रियानेच जगातील सर्व व्यवहार करीत जा. कर्मे सोडणे इष्ट नाही. ती अवश्य केली पाहिजेत असा गीतेचा भावार्थ आहे. यासच भागवत- धर्म असे म्हणतात. भागवत व स्मार्त या शब्दाचे अर्थ व्यवहारात काही लोक