Jump to content

पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ गांधी व सत्याग्रहाची चळवळ ४ घेण्याकरिता. प्रेस अॅक्ट मोडून छापलेली पुस्तके विकण्याचे काम चांगल्या चांगल्या लोकानी सुरू केले. मुंबईहून दिल्लीस जाऊन ही चळवळ सुरू करावी म्हणून गांधी निघाले तो वाटेत त्याना कोसिकलन स्टेशनावर पंजाबात शिरण्याच्या बंदीचा हुकूम लावण्यात आला. परंतु 'मी तो मान्य करीत नाही' असे म्हणल्या- वर पोलिसानी गांधीना अटक केली व त्याना निराळ्या गाडीतून मुंबईस परत पाठविले. या बातमीमुळे दिल्लीसच काय पण इतर अनेक ठिकाणी पुनः गडबड झाली. गांधीना मुंबईस आणून सोडले त्या दिवशी मुंबईसह बरीच गडबड उडाली. परंतु गांधीनी आपल्याला अटक झाली तरी चांगले वागविले बगैरे सांगून लोकांची मने शांत केली. त्यानी जीव तोडून अहिंसेचा उपदेश केला व ही चळ- वळ शांततेने केली तरच यशस्वी होईल असे सांगितले, पण या उपदेशाने काही कार्य न होता रौलेट बिलाना चिडून लोकानी खूप धामधूम केली. सर्वात अनिष्ट प्रकार अमृतसर येथे घडले. त्यात लोकानी काय केले अधि- कायनी काय केले याची फोड करीत बसण्यापेक्षा 'अनर्थ कोसळला' एवढे मोघम वर्णन केलेलेच बरे. खून चढावा त्याप्रमाणे लोकानी आगळीक करून जाळपोळ व हाणामारी केली आणि मग त्याचा सूड सरकारने एकास शंभरपट या मापाने घेतला. पण लष्करी कायद्याने पंजाबात केलेली धामधूम दंगेधोपे जालियन- वाला बागेतील कत्तल लोकांची मानहानि करण्याचे झालेले अमानुष प्रकार लष्करी चौकशा आणि भयंकर कडक शिक्षा या सर्वांचा इतिहास सांगत बसल्यास तो एक ग्रंथच होईल म्हणून ते करण्याचे सोडून देऊन इतकेच म्हणतो की १८५७ नंतर सरकारी अत्याचाराच्या दृष्टीने एप्रिलातील या आठवड्यासारखे दिवस हिंदुस्थानाने एरव्ही केव्हाहि पाहिले नाहीत! शिमग्यात रात्रभर दंगल माजवून जिकडे तिकडे होळ्या पेटवून जागलेले लोक सकाळी झोंपत पड- ल्यामुळे जशी स्मशानी शांतता गावात दिसते त्याप्रमाणे एप्रिलचा हा आठ- वडा प्रथम भडकून गेला आणि त्यानंतर लोकात इतकी निश्चलता व उदासीन- पणा आला की सांगता पुरवत नाही. पण लष्करी कायद्यामुळे सरकाराने असा बंदोबस्त ठेवला होता की इकडची बातमी म्हणून तिकडे जाऊ नये ! यामुळे ठिक- ठिकाणी घडलेल्या प्रकाराची वर्णने केवळ घड्याच्या चिरांतून पाणी झिरपावे त्याप्रमाणे हळूहळू कर्णोपकर्णी लोकाना कळत होती. आणि पुढे स्थिरस्थावर होऊन चौकशा सुरू झाल्या तेव्हा खरा प्रकार बाहेर येऊ लागला. कोणाला आश्चर्य वाटेल पण जालियनवाला बागेच्या कत्तलीत खरे काय घडले याची एप्रिल- तली बातमी विलायतेत ऑक्टोबर महिन्यात कळली ! पुढे चौकशी होऊन प्रत्यक्ष जबान्याच झाल्या तेव्हा मग सर्वच गोष्टी छापून प्रसिद्ध झाल्या हे निराळे. सत्या- ग्रहाची चळवळ व त्यानंतर झालेले पंजाब प्रकरण यांची थोडीशी कल्पना येण्या- कारिता केसरीचे दोन उतारे वाचकां करितां पुढे दिले आहेत.