पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्कृतीचे, जीवनरितीचे आहे. वर्षापासून ही समन्वय समरसतेची प्रक्रिया सतत सुरू आहे. त्यातून एकमेकांच्या श्रद्धा, परंपरा, देवता यांचा स्वीकार केला. या संदर्भात इरावतीबाई कर्वेनी 'हिंदू समाजः एक अन्वयार्थ' या ग्रंथात 'नवस्वीकृतींचा ॲग्लोमेरॅशन सिद्धान्त मांडला. त्या लिहितात 'ही ऐतिहासिक घटना म्हणजे सतत स्वीकारची प्रक्रिया आहे. कोणत्याच दोन पर्यायी गोष्टींमध्ये एकीचा स्वीकार व दुसरीचा कायम त्याग असा प्रकार दिसून येत नाही." या नवस्वीकृतीमुळे भारतीय संस्कृतीची अभिजातता अधिक समृद्ध झाली आहे. आज २१ व्या शतकात प्रवेश करून सात वर्षे पूर्ण झालीयेत. या सांस्कृतिक एकात्मतेचा प्रत्यय कन्याकुमारी ते काश्मीर आणि जगन्नाथपुरी ते द्वारकेपर्यंन्त येतो. विविध विधी, सण, उत्सवांतून येतो.
 अगदी जवळ आलेला सण म्हणजे रक्षाबंधन, राखी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा. इतिहास काळात उदयपूरची राणी कर्मवती हिने गुजराथच्या बहादुरशहापासून रक्षण व्हावे म्हणून हुमायूनला भाऊ मानून राखी पाठवली. अशी अनेक उदाहरणे. पूर्वी ही प्रथा उत्तर प्रदेशात रूढ होती. आता ती महाराष्ट्रानेही स्वीकारली आहे. भावाने बहिणीला केवळ आर्थिक वा कौटुंबिक नाहीतर मानसिक आधार द्यावा ही या 'राखी' मागची भूमिका. पुराण काळात श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा विधी करत. पहाटे उठून शुचिर्भूत होऊन तांदुळ, सोने आणि पांढरी मोहरी थोडेथोडे घेऊन त्याची पुरचुंडी करावी. ती 'रक्षा' उर्फ राखी. तिची पूजा करून मंत्र म्हणून मंत्र्याने राजाच्या मनगटावर बांधावी. मंत्र असा

येन बद्धो बलिराजा, दानवेन्द्र महाबलः।
तेन त्वामपि बध्नामि, रक्षे मा चल मा चल।।

 महाबली बळिराजां जिने बांधला गेला ती रक्षा मी आपल्याला बांधत आहे. हे रक्षे तू चलित होऊ नकोस. कुठेही जाऊ नकोस. या पुरचुंडीला लालपिवळाशुभ्र असा दोरा बांधून राखी तयार करतात. आपण शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो, राख तथा रक्षा जमिनीच्या सुफलनासाठी. तिच्यातील उर्जाशक्ती वाढण्यासाठी उत्तम असते. हे इथे लक्षात घ्यावे.

 महाराष्ट्रात या पौर्णिमेला नारळी पौर्णिमाही म्हणतात. कोकण किनारपट्टीवर हा दिवस थाटात साजरा होतो. ज्येष्ठ आषाढात दक्षिणेकडून धावत येऊन वेगाने धुमाकुळ घालणारी वादळे शांत होतात. या दिवशी समुद्राची पूजा करून, नारळ फोडून समुद्र किनाऱ्यावरचे कोळी लोक मासेमारीसाठी बोटी समुद्रात सोडतात. पूर्वी प्रवासी बोटीही. हा मुहूर्त साधून सागरातून प्रयाण करीत. गेल्या ५० वर्षात तांत्रिक प्रगती शिगेला पोचली

रुणझुणत्या पाखरा / ७७