Jump to content

पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'तू जिचा विचार करीत होतास तिचा आणि तुझा एक वर्ष विरह होईल,' लगेच यक्षाची पाठवणी नागपूर जवळच्या रामगिरी पर्वतावर झाली. आषाढाच्या पहिल्या दिवशी काळ्याभोर मेघरूपी बलदंड हत्तींचे थवे उत्तरेकडे जातांना पाहून यक्षाने त्या मेघांनाच दूत करून आपल्या पत्नीला आपली हृदय व्यथा व निरोप कळविला. तिचे निवासस्थान हिमालयातील कैलास शिखरावरील अलकानगरीत होते. तिथे जाण्याचा भौगोलिक मार्गही त्याने मेघाला सांगितला.
 काश्मिर, ओरिसा, बंगाल, मध्यप्रदेश येथील लोक त्याला आपला रहिवासी मानतात. पण तो भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा भारतीय महाकवी होता आणि आहे. त्याला हिमालयाचे, तेथील निसर्गाचे आकर्षण होते. कुमारसंभव, मेघदूत या काव्यात हिमालयाचे देखणे वर्णन त्याने केले आहे. 'उपमा' हे तर त्याचे वैशिष्ट्य राजकवी म्हणून निवड करण्यापूर्वी राजाने त्याला प्रश्न विचारला

कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृष्यते

 (कमलावर दुसरी दोन कमळे आहेत असे म्हणतात, पण ती दिसत नाहीत. तर कशी?)
 या श्लोकाची परिपूर्ती करतांना त्याने उत्तर दिले,

'बाले तव मुखाम्भोजात् कथमिन्द्रीवरद्वयम्

 बाले तुझ्या मुखकमलावर तुझे दोन निळे निरागस डोळे, ती जणु दोन कमळेच!
 असा हा कवी कुलगुरू. प्रत्येक भारतीयाने याच्या काव्याबद्दल, नाटकांबद्दल, त्याच्याबद्दल वाचले पाहिजे. तरच आपले 'भारतीयत्व' चहुअंगांनी बहरून जाईल. संपृक्त होईल.

रुणझुणत्या पाखरा / ३७