त्या दिवशी सकाळीच मोठ्या घरून निरोप आला. आज पौर्णिमा आहे. दोघांना जेवायला घरीच बोलावलंय. मी इथे संसार मांडून जेमतेम महिना झाला होता. जातपात, विवाह जुळवण्याची पारंपरित रीत....यांच्या सीमा ओलांडून दसऱ्याला खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन केले होते. त्याच्या घरच्यांना सद्भावाने जिंकायचे एवढेच उद्दिष्ट समोर होते. शिवाय विवाहाला होकार देतांना पिताश्रींनी एकच मंत्र दिला होता.
...प्रेमात पडलं की फक्त गुणच दिसतात. संसारात सारीपाट एकदा मांडलात की मतभेद एकमेकांचे स्वभावदोष यांचाही अनुभव येईल. पण त्यावेळी शांतपणे एकमेकांना समजून घ्या आणि दोषासकट 'आपलं माणूस' म्हणून एकमेकांचा स्वीकार करा. अशा तऱ्हेचे विवाह यशस्वी होणे देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. ...आज या सर्वात्मक स्वीकाराची चाळिशी उलटून गेली आहे. पण त्यांचे शब्द ताजे आहेत.
तर, सासरच्यांचे मन जिंकायचे म्हणजे 'या' म्हटले की जायचे. हा म्हणाला थोडी लवकर जा. मदत कर. घरी पुरणावरणाचा तळणा, भज्यांसकट साग्रसंगीत स्वयंपाक झालेला होता. मी घरात शिरले तर सासूजी मोठ्या भाभीजींना सांगत होत्या.
'बिनणी, पैले बिरामणीने... रसोईवाल्या दादीजीने जिमाई दे. पछे टाबरटुबर, मोठ्याराना पुरस दे...'