थंडीची कुडकुडणारी लाट वर्षा-दोन वर्षांनी येतच असते आणि खरे तर आपण मध्यमवर्गीय माणसे तिची वाट पाहतोच. बे एकम् बेच्या पाढ्याच्या तालावर जगणाऱ्या माणसांना हा बदल खूप हवासा वाटतो. खरेतर आश्विन पुनवेला शेकोटी पेटवून गप्पाष्टकांचा डाव मांडायला सुरुवात होते. पण अलीकडे कोजागिरी, दिवाळीचे पहिले पाणी बिनाथंडीतच जातात.
'दिवाळी संपली. तुळशीचं लगीन हाकेवर आलंय. पण थंडी पळाली की!' 'यंदा शेकोटीची मजा लुटायला मिळणार की नाही?' असे संवाद ऐकू येत आहेत, तोवर थंडीबाई दारात येऊन शीळ घालतात आणि दृष्टी सृष्टीचा नूर बदलून टाकतात. कधी पूर्वेच्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ थैमान घालते, तर कधी दक्षिणेकडच्या हिंदी महासागरावर वादळे घोंगावतात. एकूण काय थंडीची लाट येतेच. रस्त्यावर, घरासमोर, बंगले-वाडे यांच्या पटांगणात, मोकळ्या जागेवर शेकोट्या पेटायला लागतात. हूहूहू हात शेकत गप्पांचे डाव, आठवणींच्या भेंड्यातही तरंगायला लागतात आणि थंडीची रंगत वाढत जाते.
थंडी प्रेमीजनांची, नवविवाहितांची विशेष लाडकी.
थंडगार ही हवा
जवळ तू हवा हवा
थंडगार ही हवा ।