पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 श्रावण अगदी अंगणात नाही तर उंबऱ्यावर येऊन ठेपतो आणि अनेकांच्या, अगदी ऐंशीच्या उंबरठा पार केलेल्यांपासून ते नुकतीच पंचविशी ओलांडलेल्यापर्यंतच्या मनात आपोआप उमटू लागतात ओळी...

श्रावणमासी, हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहींकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी ऊन पडे ।।

 आणि ही ताजी हिरवळ तनामनात झुळकू लागते. गैरसमजांचे काळे ढग कमी होऊन स्वच्छ निरभ्र ऊन पडते. अशा वेळी माहेरच्या आठवणीचे शहारे अंगभर लहरू लागतात. ओठांवर चव घुटमळू लागते आईच्या हाताच्या खांडवीची. नागपंचमीला तवा चुलीवर ठेवायचा नाही ही परंपरा. देशावर पुरणाची उकडलेली दिंडं करतात, तर कोकणात तांदळाचा रवा साजूक तुपावर भाजून, त्यात गुळाचे पाणी घालून केलेला शिरा. थाळ्याला तूप लावून अलवार हाताने पसरवायचा. वर ओलं खोबरं, वेलचीची पूड, बदामाचे काप घालून चौकोनी रेशमी वड्या पाडायच्या. भेंडीची भाजी, सोलकढी, गरम वाफेचा भात, नारळाची चटणी नि खांडवी असा बेत आजोबा असेपर्यंत घरी होईच. मी खांडवी करते; पण ती तोंडात घोळणारी नि रेशीम स्पर्श असे काही जमत नाही.

१५० / रुणझुणत्या पाखरा