पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गाडी जाई नि शेवटी काय वाचतेच? काय लिहिते आहेस अलिकडे?" इथे येऊन थांबे. आणि माझ्याजवळ उत्तर नसे.
 गप्पांच्या ओघात स्वतः वहाणे, इतरांना वाहत नेणे, अशा ऐसपैस अण्णांना केवढी दुष्ट शिक्षा. माझ्या मनात येई पंढरपूरच्या पांडुरंगाला एकान्तवासाची शिक्षा दिली तर काय अवस्था होईल? जसा तो लेकुरवाळा तसेच अण्णाही लेकुरवाळे. मराठवाड्यातील, उभ्या महाराष्ट्रातील हजारो जणांना इथून अव्याहत पसायदान मिळे. आणि या पांडुरंगाची रखुमाईही कायम द्रोपदीची थाळी घेऊन उभी असे.
 मी अण्णांच्या मायेच्या खोप्यात प्रवेश केला १९६० साली. वक्तृत्व स्पर्धा औरंगाबादेत होत्या. मी नि अशोक मोडक यांची निवड झालेली. पण बरोबर प्राध्यापक पाठवणे न परवडणारे. मग माझे वडिल म्हणाले, तू अनंतराव भालेरावांकडे जा. मी चिठ्ठी देतो. आणि मी गेले.
 'अरे तू आमच्या शंकररावांची मुलगी का? वा वा बस. अग सविता...' अण्णांनी चिठ्ठी वाचून सविताला बोलावले. ती असेल दहावीत. तिला हाक मारण्यातून, तिची ओळख करून देण्यातून लेकीविषयीची अपार माया आणि अभिमान मला जाणवला होता. बाप आणि लेकीचे गहिरे नाते असते. ते शब्दांपल्याडचे असते. ते लेकींनाच उमगते.
 तेव्हाचे ते मिणमिणते औरंगाबाद. डोंगरदऱ्या पार करत पोचावे तशी गाठलेली सन्मित्र कॉलनी. तिथे अण्णा भेटले. कुटुंब वत्सल. अतीव आपुलकीने भरलेला, खास मराठवाडी वळणाचा सरळसोट आवाज ऋणानुबंध जुळला. लोहियाशी लग्न करून मी मराठवाड्यात आले. त्याचे 'गॉडफादर ' बापू काळदाते पण अण्णा मात्र माझे माहेर होऊन भेटले. त्यांचे पितृवात्सल्य माझ्याही वाट्याला आले. लग्नापूर्वीच मी माहेरचा खोपा शोधून ठेवला होता.
 मराठवाड्यातील पुरोगामी व्यक्तींना, चळवळींना दैनिक मराठवाडा आणि अण्णा यांचा हक्काचा आधार होता. धुळे, जळगाव, नासिक हे जिल्हे लागूनच. प्रत्येक जिल्ह्याचे घर, चूल, अंगण वेगळे. पण आमच्या मराठवाड्यात मात्र तसे नाही. परभणीकरांना लातूर, बीड आपले वाटणार तर नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबादकरांना लातूर, बीड, परभणी, हिंगोली आपले वाटणार. भलेही चुली वेगळ्या असोत. पण घर आणि अंगण एकच. या परिसरात एक 'मिळालेपण' आहे. ही मानसिक एकात्मता रझाकार विरोधी चळवळीने पक्की केली असावी. स्वातंत्र्योत्तर काळात ती टिकवून धरण्याचे काम मराठवाडा दैनिकाने, अनंतराव... गोविंदभाई, बाबासाहेब परांजपे

१३० / रुणझुणत्या पाखरा