पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आसपासच्या वस्त्यांमधून सुमारे साठसत्तर महिला आल्या होत्या. पंजाबी ड्रेस, साडीत फक्त आम्हीच होतो. या भागात मातृसत्ता अजूनही आहे. अनेक एकाकी महिला मुलांसह आल्या होत्या. नागा बंडखोर, उल्फा, बॉर्डर सिक्युरिटीचे जवान यांच्याशी झालेल्या चकमकींमध्ये पुष्कळदा पुरूष मारले जातात. परंतु स्त्रिया कष्ट करून मुलांना वाढवतात. असे चौकशीअंती कळले. परित्यक्तांचा प्रश्न इथे नसावा. कारण वयात आलेली स्त्री घरावर बोझ.. बोजा बनत नाही. शेती, बांबूपासून बनवलेल्या कलात्मक वस्तू, वस्त्र विणणे यांत ती वाकबगार बनते. या प्रदेशात हिंडतांना मला दोन गोष्टींची आठवण आली.
 अंबाजोगाईचे ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले होते. त्रिपुरा, नागालँड, अंदमान निकोबार वगैरे भारतीय प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव असत. माझ्या मुलांबरोबर ही मुले घरी येत. नवरात्रात एक दिवस आमच्या छोट्याशा गावातील परप्रान्तीय मुलांना अल्पोहारासाठी मी बोलावत असे. तो होतकरू डॉक्टर नागालँडचा होता. आपले भारतीयत्व यावर गप्पा सुरू होत्या. या भावी डॉक्टरने, आपल्या पाणीदार चिमुकल्या डोळ्यात गंभीर भाव आणीत सांगितले होते. "माफ करा. मी प्रथम ख्रिश्चन आणि मग भारतीय आहे. माझे पणजोबांचे आजोबा माणसाची शिकार करून, भाजून मांस खात...ख्रिश्चन मिशनरीजनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता, अनेकांनी मरण स्वीकारून आम्हाला माणसांत आणले. हे सारे भलेही धर्मप्रचारासाठी असेल!! पण आज आम्ही त्यांच्यामुळेच माणूस म्हणून जगत आहोत."
 ...दुसरी आठवण मणिपूरच्या छोबी देवीची. १९९५ च्या आंतरराष्ट्रीय बीजिंग महिला परिषदेत सादर करावयाच्या संगीतिकेची तालिम दिल्लीत सुरू होती. प्रत्येक प्रांतातल्या एकदोन अशा कार्यकर्त्या त्यासाठी दिल्लीत जमल्या होत्या. त्यात मणिपूरची छोनी देवी होती. ती नुपी समाज महिला पाईपीची अध्यक्षा होती. ती इम्फाळहून आली होती. त्यांची समस्या अशीच. नक्षलवादी, समजून अनेक तरूणांना बॉर्डर सिक्युरिटीचे पोलिस घरात येऊन पकडून नेतात. गोळ्या घालून ठार मारतात. त्या विरूद्ध या महिला पाइपी लढत होत्या. मणिपुरी नृत्याची आगळी परंपरा आहे. महाभारतातील अर्जुनाची पत्नी चित्रांगदा मणिपूरची राजकन्या होती...भारतीयत्वाच्या अतिप्राचीन खूणा आजही नैऋत्येत जाणवतात.
 भारतीय स्वातंत्र्य साठवर्षाचे होते आहे. त्या सात चिमण्या बहिणींच्या हृदय मनापर्यन्त पोचण्याचे प्रयत्न केवळ शासकीय पातळीवरून करून चालणार आहे?असा प्रश्न मनात येतच राहतो...

१०४ / रुणझुणत्या पाखरा