पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदिवासींच्या जमाती गटागटाने राहणाऱ्या. मग त्यांची भाषा, जमातीचे नांव वेगळे. पण घरे, पोषाख यांत नितान्त सारखेपणा.
 झीरो हे आपातनी पठारावरचे, लोअर सुबनसरी जिल्ह्याचे महत्त्वाचे गाव. इटानगर ही राजधानी नेहरलॅगून या जिल्ह्यात येते. झीरोला जातांना जंगलांच्या मध्यात, डोंगर माथ्यावर, उतारावर रहाणाऱ्या आदिवासींची घरे दिसली, लाकूड आणि बांबूंचा, झुलती घरे बांधण्यासाठी खूप छान उपयोग करून घेतला आहे. झाडांचे बुंधे, दणकट बांबूंचे पुंजके जमिनीत रोवून, त्यांच्या आधाराने जमिनीपासून आठ दहा फूट उंचावर, उतरत्या छपरांच्या झोपड्या बांधून लोक रहातात. जंगलाच्या मध्यात चिखल, वाहणारे पाणी, सरपटणारे प्राणी या पासून रक्षण करणारी ही चिमुकली घरे. वर जायला शिडी. अर्थात अशी घरे शहरात नाहीत.
 चढणीचा पहाडी रस्ता, भवताली अगदी... अगदी घनगर्द झाडी. गहूभर पुढे आणि तिळभर मागे असे करीत डोंगर चढायचा. आलो एकदांचे माथ्यावर असे म्हणून निःश्वास टाकावा तर पुढे अधिक उंच डोंगर दत्त म्हणून पुढे उभा ठाकलेला. उंच उंच कडे एकापुढे एक उभे. दुसऱ्या कड्यावर जायचे तर डोंगर उतरून परत चढणे अशक्यच. अनेक ठिकाणी दोन कड्यांमध्ये लोखंडाच्या जाड, रूंद, भक्कम पत्र्यांचे पूल टाकलेले आहेत. सतत पस्तीसं... पंचवीस अंशाच्या कोनातून वळणाऱ्या अरुंद रस्त्यांवरून आणि लोखंडी पत्र्यांच्या पुलावरून मोठ्या बसेस जाणे अशक्यच. अरुणाचलमध्ये सुमो, ट्रॅक्स अशा गाड्या प्रवाशांसाठी असतात. पुलावरून जातांना येणारा कर्कश असा खड्डम आवाज. कालच्या झोपेत ऐकलेल्या आवाजाचे रहस्य झीरोकडे जातांना उलगडले. आणि खोल खोल दरीतून दगड गोट्यांतून फेसाळत वाहणाऱ्या बेधुंद झऱ्यांनाही अनुभवले. ते रस्ते, ते पूल, पर्वतरांगाची डोळे फिरवणारी उंची, हिरवाईच्या लाखो छटा, फुलांचे तऱ्हेतऱ्हेचे रंग, कुठे हिरव्यात जांभुळी नाहीतर उगवतीची लाल रेशमी छटा. तर कुठे पिवळ्यावर हिरवा मुलामा द्यावा अशा रंगाची, दुरूनही जाड आणि घट्ट पोत जाणवावा, अशा पानांची झाडे. उत्तुंग वृक्षांचे गगनभेदी जंगल एका कडेला आणि दुसऱ्याकडे पिवळ्या.. निळ्या.. लालगुलाबी रेशीम फुलांची बेटे. वसती आली की बांबूच्या झोपड्या लागत. पाठीवरचे ओझे सहजपणे वागवीत चढ उतारावरून वावरणाऱ्या स्त्रिया, भाताच्या शेतीचे उतरते तुकडे, दिसू लागले की समजावे गांव आले. सततच्या साडेतीन चार तासांच्या चढणीच्या प्रवासानंतर 'झीरो' आले. थंडी आणखीनच वाढली. अरुणाचलमध्ये प्रत्येक जिल्ह्यात विवेकानंद केन्द्र आहेच. रामकृष्ण मिशनच्या मुलांच्या आणि माँ शारदा मिशनच्या मुलींच्या शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. केन्द्राच्या विशाल हॉलमध्ये बैठक होती.

रुणझुणत्या पाखरा / १०३