पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून बंगाल व पंजाबच्या फाळणीला त्यांनी विरोध केला. (लोकसंख्येच्या अदलाबदलीची मागणी न करण्याचा सल्ला त्यांना सर फॉन्सिन मूडी यांनी दिला असे कृपलानी आपल्या पुस्तकात म्हणतात.) परंतु हा विरोध माउंटबॅटन यांच्या दडपणापुढे चालला नाही. ब्रिटिश सरकार जिथे संपूर्ण त्यांना साथ देईल तिथेच त्यांच्या मागण्या मान्य होत, हे त्यांच्या लवकर लक्षात आले नाही.
 राजाजींच्या योजनेनुसार सध्याचे पाकिस्तान आधीच सदिच्छेने जीनांनी न मिळविण्याचे कारण त्यांच्या स्वभावात आणि व्यक्तित्त्वातही आहे. सदिच्छा त्यांच्या स्वभावात बसत नव्हती. ते स्वभावतःच भांडखोर होते. आपण गांधी-नेहरूंशी भांडून, त्यांना नामोहरम करून पाकिस्तान मिळविले आहे हे एरवी ते मुस्लिम समाजाला दाखवूच शकत नव्हते. पाकिस्ताननिर्मितीचे जरादेखील श्रेय त्यांना इतरांना, विशेषत: गांधी-नेहरूंना, द्यायचे नव्हते. सध्याचे पाकिस्तान सदिच्छेने जीनांनी मान्य केले असते, तर आपण मुसलमानांचे मित्र आहोत ही गांधी-नेहरूंची भूमिका मान्य केल्यासारखे झाले असते. तसे मान्य केले असते तर उपखंडातील हिंदू-मुसलमानांतील हा ऐतिहासिक संघर्षच कदाचित संपुष्टात आला असता. निदान संघर्षाला मुसलमान नेत्यांना निमित्त राहत नव्हते. पाकिस्तान काँग्रेसच्या नेत्यांनी नाईलाजाने दिले. त्यांनी मनापासून मुसलमानांच्या वेगळ्या राष्ट्राचे अस्तित्व मान्य केलेले नाही, त्यांना पुन्हा पाकिस्तान नष्ट करून अखंड भारत स्थापन करावयाचा आहे ही जीनांनी नंतर घेतलेली भूमिका त्यांना एरवी घेता येणे शक्य नव्हते.
 माउंटबॅटन यांची ३ जून १९४७ ची म्हणजे सध्याच्या फाळणीची योजना उधळून लावण्याचे जीना प्रयत्न करीतच होते. परंतु यावेळी नेहरूंनी दिलेल्या अंतिमोत्तराने आणि माउंटबॅटननी दिलेल्या धमकीने त्यांनी शरणागती पत्करली. “तुम्ही ही योजना स्वीकारल्याचे जाहीर केल्याखेरीज आपली संमती गृहीत धरू नये असे काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला सांगितले आहे. मी तुम्हाला मोठ्या कष्टाने मान्य करीत आणलेली ही योजना उधळू देणार नाही आणि मग तुम्हाला सध्याचे पाकिस्तानही मिळणार नाही" असे माउंटबॅटननी त्यांना सांगितले. ब्रिटिशांच्या पाठिंब्याचा आधार गेल्यानंतर संमती दिल्याखेरीज जीनांपुढे पर्याय उरला नव्हता. त्यांनी ही योजना मान्य केली आणि 'डॉन' या लीगच्या मुखपत्राकरवी दोन पाकिस्तानी विभागांना जोडणाऱ्या जोडपट्टीची मागणी करायला सुरुवात केली. जेव्हा काँग्रेसचे सरचिटणीस शंकरराव देव यांनी या मागणीला विरोध करणारे पत्रक काढले, तेव्हा 'डॉन' ने 'वेडपट' अशी त्यांची संभावना केली. अखेरीला जीनांच्या या तंत्राला कंटाळून नेहरूंनी लीगने ही योजना मान्य न केल्यास ती रद्द झाली असे समजून अखंड भारताची घटना बनवायच्या आम्ही मार्गाला लागू' असा इशारा दिल्यानंतर, आता अधिक प्रदेश मिळणे शक्य नाही याची जाणीव होऊन जीनांनी ही फाळणीची योजना स्वीकारली.

 नाईलाजाने छोट्या आकाराचे पाकिस्तान स्वीकारल्यानंतर वरकरणी जीनांनी मित्र म्हणून आपण वेगळे होत आहोत अशा अर्थाचे निवेदन केले आणि कराचीला गेल्यानंतर

पाकिस्तानची चळवळ/७७