नाहीत हे पाहताच ब्रिटिश सरकारने वेव्हेल यांना बदलून लॉर्ड माउंटबॅटन यांना आणले आणि त्यांनी ३ जून १९४७ रोजी फाळणीची योजना जाहीर केली. या योजनेने बंगाल आणि पंजाबची फाळणी करायचे ठरले. आसाम पाकिस्तानातून वगळण्यात आला आणि त्याच्या सिल्हेट या मुस्लिम-बहसंख्य जिल्ह्याला सार्वमताने भारत वा पाकिस्तानात सामील होण्याचा पर्याय देण्यात आला. हाच पर्याय काँग्रेसचे तोपर्यंत बहुमत असलेल्या सरहद्द प्रांताला देण्यात आला. अशा रीतीने डावपेचांच्या अखेरीस संकल्पित पाकिस्तानात अर्धा पंजाब, अर्धा बंगाल आणि सबंध आसामवरील हक्क सोडणे जीनांना भाग पडले.
वस्तुत: १९४२ सालीच राजाजींनी सुचविलेल्या मसुद्यात माउंटबॅटन यांच्या योजनेतील पाकिस्तान जीनांना देऊ करण्यात आले होते. १९४३ साली आपल्या मसुद्याला राजाजींनी गांधीजींची संमती घेतली होती. या मसुद्यात बंगाल आणि पंजाबची फाळणी करण्याचे तत्त्व मान्य केले होते. त्याचबरोबर निर्भेळ मुस्लिम बहुसंख्यांक प्रदेशात अल्पसंख्यांकांसकट सर्वांच्या सार्वमताने भारतात राहावयाचे की वेगळे राष्ट्र स्थापन करावयाचे हे ठरविण्याचा पर्यायही मान्य करण्यात आला होता. हा मसुदा जीनांनी मान्य केला नाही. हे मोडकेतोडके पाकिस्तान आहे, असा त्यांचा आक्षेप होता.
अखेर माउंटबॅटन-योजनेप्रमाणे राजाजींच्या मसुद्यात अंतर्भूत असलेले मोडकेतोडके पाकिस्तानच जीनांना मिळाले. हीच भौगोलिक मर्यादा असलेले पाकिस्तान त्यांनी राजाजींच्या सूचनेप्रमाणे सदिच्छेने का मिळविले नाही? जीनांचे व्यक्तित्व आणि मुस्लिम समाजाच्या इच्छा-आकांक्षा समजून घेतल्यानेच या प्रश्नाचे उत्तर सापडेल.
एक तर जीनांना मोठे पाकिस्तान हवे होते. यादवी युद्धाच्या धमक्या आणि हजारो निरपराध माणसांची कत्तल करण्याचे धोरण विशाल पाकिस्तानच्या निर्मितीसाठी त्यांनी जाणूनबुजून अवलंबिले होते. आपल्या धमक्या व ब्रिटिश सत्तेचे दडपण या दोघांच्या संयुक्त दबावापुढे काँग्रेसचे नेते नमतील असा त्यांचा समज होता. पंजाबात शीख हा तिसरा संख्येने लहान परंतु वृत्तीने मुसलमानांइतकाच कणखर असलेला समाज अस्तित्वात आहे आणि त्यालाही त्याच्या नुकत्याच घडलेल्या वैभवशाली शीख साम्राज्याचा विसर पडलेला नाही हे कळण्याची जीनांच्यात पात्रताच नव्हती. (पेन्डे रल मून म्हणतात, चेंबलेंनना झेकोस्लोव्हाकियाची जेवढी माहिती होती तेवढीच जीनांना पंजाबची होती.) आपल्या धमक्यांपुढे शीखदेखील शरणागती पत्करतील असा त्यांचा समज होता. या धमक्यांमुळे उलट शीख भयभीत झाले आणि सुरुवातीला वेगळ्या राज्याचा पुकारा करीत राहिले, तरी अखेरीला त्यांना पंजाबातील हिंदूंबरोबर हातमिळवणी करावी लागली. पंजाब आणि बंगालची फाळणी केली गेली तरच भारताच्या फाळणीला काँग्रेसचे नेते मान्यता देतील हे माउंटबॅटन यांच्या लक्षात आले. आणि मग धमक्या देण्याची जीनांची सद्दी संपली. उलट त्यांनाच धमक्या देऊन या मोडक्यातोडक्या पाकिस्तानला तयार करण्याची भूमिका माउंटबॅटननी स्वत:कडे घेतली.
जीना अर्थातच सहजासहजी बंगाल आणि पंजाबच्या फाळणीला तयार झाले नाहीत. उद्या लोकसंख्येची अदलाबदल झाल्यानंतर मुसलमानांना पुरेशी भूमी असली पाहिजे असे