पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

- 'Mission with Mountbatten.')
 जीनांनी अथवा इतर लीगवाल्यांनी या सक्तीच्या धर्मातराचा निषेध केलेला नाही आणि या दुर्दैवी जीवांना पुन्हा त्यांच्या धर्मात सामील होऊ द्यावे असे मुसलमानांना आवाहनही केले नाही. स्त्रियांचे अपहरण करण्याच्या प्रकारालाही जीनांनी उत्तेजन दिले. सरहद्द प्रांतात १९४७ साली झालेल्या दंगलीत एक शीख ठार झाला आणि त्याची बायको पळविली गेली. तिच्या नातेवाईकांनी तेव्हाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री डॉ. खानसाहेब यांच्याकडे तक्रार केली. डॉ. खानसाहेबांनी तिला हुडकून तिच्या नातेवाईकांच्या हवाली करण्याचे पोलिस अधिकाऱ्यांना हुकूम दिले. त्याप्रमाणे तिचा शोध लावून तिला तिच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले. सरहद्द प्रांत मुस्लिम लीगने अब्दुल कयुमखान यांच्या नेतृत्वाखाली खानसाहेबांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी प्रचंड निदर्शने केली. (कयुमखान याच्या आधी सहा महिनेच काँग्रेसमधून फुटून लीगमध्ये सामील झाले होते. मुस्लिम लीगमध्ये सामील झाल्यामुळे त्यांना मुस्लिम लीगच्या वेगळ्या राष्ट्रवादाची मतप्रणाली मान्य होणे समजू शकते. स्त्रियांच्या अपहरणाचे समर्थन काँग्रेसचा त्याग करताच ते कसा काय करू शकतात? की काँग्रेसमध्ये असतानादेखील ते अन्याय मानीत नव्हते असे समजायचे?) जीनांनी अशा प्रकारच्या लीगवाल्यांच्या निदर्शनांचा. धिक्कार केलेला नाही किंवा त्यांना आवरलेही नाही. नौआखलीत गुलाम सर्वर हा लीगचा कार्यकर्ता पद्धतशीरपणे दंगली घडवून आणीत होता. मुंबईला काळबादेवी रोडवर भर रस्त्याने मोटारमधून एका लीगवाल्याने ब्रेनगन चालविली आणि अनेक हिंदूंना ठार केले. कलकत्ता आणि नौआखली येथील दंगलींची तीव्र प्रतिक्रिया बिहारमध्ये उमटली आणि.१९४७ च्या आरंभी तेथे हिंदू मुसलमानांवर तुटून पडले. दंगलीत हिंदूच मार खातील असा दंगलींना उत्तेजन देताना जीनांनी आपला समज केला असावा असे दिसते. बिहारमधील प्रतिप्रहारामुळे जीना लोकसंख्येच्या अदलाबदलीची भाषा बोलायला लागले. बिहारच्या दंगलीनंतर त्यांनी काढलेली पत्रके आणि कलकत्ता आणि नौआखली दंगलींच्या नंतरची त्यांची प्रतिक्रिया यांत महदंतर आहे. उठल्यासुटल्या यादवी युद्धाची धमकी देण्याचा त्यांचा सूर बिहारच्या दंगलीनंतर बदललेला आहे. दंगलींच्या या क्रूर खेळात मुसलमानांची जीवितहानी अधिक होणार हे लक्षात आल्यानंतर त्यांचा सूर बदलावा हे स्वाभाविक आहे. बिहारच्या दंगलीनंतर त्यांनी फाळणीची ठाम भूमिका घेतली. आता आपल्याला हिंदूंबरोबर एकत्र रहावयाचे नाही. आपल्याला अखंड भारतात पन्नास टक्के सत्तादेखील नको असे त्यांनी नॉर्मन क्लिफ् या न्यूज क्रॉनिकल' च्या प्रतिनिधीला सांगितले.

 त्रिमंत्री शिष्टमंडळ भारतात पाठविताना केलेल्या भाषणात ब्रिटिश पंतप्रधान श्री. ॲटली यांनी अल्पसंख्यांकांना बहसंख्यांकांच्या प्रगतीच्या मार्गात व्हेटो दिला जाणार नाही असे म्हटले होते. परंतु तीन-सदस्य शिष्टमंडळाने सुचविलेली संघराज्याची योजना अल्पसंख्यांकांच्या हातात व्हेटो देण्याचाच प्रकार होता. संघराज्याची योजना बारगळल्यानंतर आणि जीनांनी फाळणीचे इतर पर्याय फेटाळून लावल्यानंतर ब्रिटिश राजनीती पुन्हा फाळणीच्या निर्णयाकडे वळली. तत्पूर्वी संघराज्य योजना काँग्रेसने जशीच्या तशी स्वीकारावी म्हणून लॉर्ड वेव्हेलनी गांधीजी आणि नेहरू यांना धमक्या देऊन पाहिले. या धमक्यांना ते बळी पडत

पाकिस्तानची चळवळ/७५