पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१९४७ नंतर असे कोणतेच प्रयत्न करण्यात आले नाहीत, आणि १९६१ च्या जनगणना अहवालात आसाममध्ये निदान ३ लाख घुसखोर घुसले असल्याचे दिसून आले. त्यातल्या त्यात गोलपाडा, नौगाव आणि काचर या जिल्ह्यांत घुसखोरीचे प्रमाण एवढे होते की गोलपाडाची पन्नास टक्के लोकसंख्या आता मुस्लिम बनली. (सविस्तर माहितीसाठी पहा - 'Census Report', 1961) यामुळे आसाम सरकार सावध झाले आणि घुसखोरांना हाकलून देण्याची त्या सरकारने कारवाई सुरू केली.
 या कारवाईला विरोध करण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि भारतीय मुस्लिमांच्या सर्व संघटना पुढे सरसावल्या. पाकिस्तानचा विरोध समजता येतो, मुस्लिम बहुमताच्या आधारे पाकिस्तानला अधिक प्रदेश मिळविणे शक्य आहे. घुसखोरीच्या मार्गाने आसामात जर मुस्लिम लोकसंख्या वाढत असेल तर पुढेमागे आसाममध्ये मुसलमानांची स्वयंनिर्णयाची चळवळ उभारता येईल आणि आसामचा तेंव्हाच्या पूर्व पाकिस्तानात समावेश करता येईल असा पाकिस्तानचा हिशोब होता. यामुळे पूर्व पाकिस्तानातून बंगाली जनतेच्या असंतोषालाही पाकिस्तानी राज्यकर्ते वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत होते. भारतीय मुस्लिम संघटनांचा या मुसलमानांना घालवून लावू नये हा आरडाओरडाही समजण्यासारखा आहे. येनकेन प्रकारेण मुस्लिमांची लोकसंख्या वाढली पाहिजे असे उद्दिष्ट असलेल्या जमायते उल्-उलेमा आणि मुस्लिम लीग यांसारख्या संघटनांनी मुस्लिमांना हुसकावून लावण्यास विरोध करणे अपरिहार्यच होते. तथापि आसामचे मुख्यमंत्री श्री. चलिहा यांनी घुसखोरांना हुसकावून न लावण्याची कारवाई चालू ठेवली. घुसखोर नसलेले भारतीय नागरिक अन्यायीपणे हसकावून लावले जाऊ नयेत म्हणून खास न्यायमंडळे नेमली. घुसखोर ठरविण्याच्या आणि त्याला हुसकावून लावण्याच्या काही पद्धती ठरविण्यात आल्या. त्यानुसार काही न्यायमंडळे नेमण्यात आली. या न्यायमंडळांविरुद्ध कोर्टात अपील करण्याची मुभा ठेवण्यात आली होती. तरीही मुसलमानांना जाणूनबुजून हुसकावून लावण्यात येत आहे अशी हाकाटी सर्व मुस्लिम संघटनांनी चालूच ठेवली.

 मुस्लिम नेते, वृत्तपत्रे आणि संघटना यांनी या प्रकरणी घेतलेली भूमिका अनेकदा परस्परविसंगत आहे. घुसखोर आलेले नाहीत ही भूमिका घेत असतानाच आलेले घुसखोर आर्थिक कारणामुळे येत आहेत आणि फाळणीपूर्वीपासून येत आहेत असे म्हटले गेले. (पहा - Radiance, dated 27.10.1963) आलेले घुसखोर भारतीय नागरिकच कसे आहेत हे सिद्ध करण्यासाठी मुस्लिम नेते व वृत्तपत्रे पुढे प्रयत्न करू लागली. त्यातले काही मासलेवाईक असल्यामुळे त्यांचा उल्लेख करणे येथे उचित ठरेल. या मुसलमानांजवळ रेशनकार्डे आहेत आणि म्हणून ते भारतीय आहेत, त्यांची नावे मतदारसंघाच्या यादीत आहेत म्हणून ते भारतीय आहेत, त्यांची मुले गेली अनेक वर्षे शाळेत जात आहेत म्हणून ते भारतीय आहेत, मुस्लिम लोकसंख्येची वाढ इतरांहून अधिक आहे आणि म्हणून मुस्लिम लोकसंख्या वाढणे म्हणजे घुसखोर येणे असे मानले जाऊ नये, १९५० च्या दंगलीत सीमेवरील असंख्य मुसलमान गाव सोडून पूर्व बंगालला आश्रयाला गेले, पुढे नेहरू-लियाकत अली कराराच्या आवाहनानुसार दोन्ही देशांतून आलेले अल्पसंख्य परत आपापल्या देशात गेले. दरम्यान १९५१ ची जनगणना

१४०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान