पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्थापन करण्याचा पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता असे पाकिस्तानचे भारतातील भाटच सांगू शकतात. उद्दिष्टांप्रत जाण्याकडे समाजाची धडपड असते. जशी उद्दिष्टे तसा समाज घडविण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे उद्दिष्टे आणि व्यवहार यांत फारकत करता येत नाही. म्हणूनच पाकिस्तानातील विचारवंतांच्या आणि लेखकांच्या पाकिस्तानी राष्ट्रवादावर लिहिलेल्या असंख्य पुस्तकांत पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांचा अथवा राष्ट्रीय जीवनातील त्यांच्या स्थानाचा किंवा ते स्थान मिळविण्याच्या त्यांच्या अडथळ्यांचा कुठेच उल्लेख आपल्याला आढळत नाही. इश्तेहाक अहमद कुरेशीपासून अझीझ अहमदपर्यंत सर्वच तथाकथित उदारमतवाद्यांच्या पुस्तकांतदेखील आपल्याला पाकिस्तानातील हिंदूंची दखलही घेण्यात आलेली दिसत नाही. इतरांना काही अस्तित्व असते, त्यांना काही हक्क असतात, याची अगदी उदारमतवादी मुसलमानाला ही जाणीव कशी नसते याचे हे निदर्शक आहे. (या संदर्भात भारतातील अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांवर, त्यांच्या एकात्मतेच्या मार्गातील अडथळ्यांवर आणि त्यांच्या अडचणींवर प्रसिद्ध होत असलेल्या लिखाणांवरून भारत आणि पाकिस्तान या देशांतील विरोध नजरेत भरतो.) पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या भाषणात आणि निवेदनातही तेथील अल्पसंख्यांकांचा क्वचितच उल्लेख केलेला असेल. आयूबखान यांनी लिहिलेल्या 'फ्रेन्डस्, नॉट मास्टर्स' या पुस्तकातदेखील पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांचा उल्लेख आढळत नाही. त्याचबरोबर या सर्व लेखकांनी भारतातील मुस्लिमांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करणारे रकानेच्या रकाने लिहिले आहेत.

 पाकिस्तानात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या एकात्मतेचा प्रश्न आणि भारतीय मुसलमानांच्या एकात्मतेचा प्रश्न यांच्यातील फरक समजावून घेतला पाहिजे. भारतीय राष्ट्रवादाने सर्व भारतीय घटकजमातींना सहभागी होण्याइतकी विशालता आधीच धारण केली आहे. या विशाल प्रवाहात सामील व्हायचे नाकारल्याने आणि आपला वेगळा समांतर राष्ट्रवाद मुसलमानांनी कायम ठेवल्याने त्यांच्या एकात्मतेचा प्रश्न किंवा हिंदू-मुस्लिम प्रश्न भारतात निर्माण झाला आहे. भारतीय मुसलमानांनी या राष्ट्रवादात सहभागी व्हायचे ठरविले तरी त्यांना काही अडथळे जरूर राहतील. परंतु ते अडथळे हेच केवळ भारतातील मुस्लिम प्रश्नांना कारणीभूत आहेत असे मानणे भ्रामक ठरेल. भारतीय मुसलमानांच्या जमाते-इस्लामीसारख्या इस्लामिक निष्ठांवर आधारलेल्या आणि राज्याच्या निष्ठांना आव्हान देणाऱ्या संघटना अस्तित्वात आहेत. मुस्लिम लीगही आहे. या प्रकरणात भारतीय मुसलमानांच्या प्रश्नांची चर्चा करणे अप्रस्तुत ठरेल. ही उदाहरणे इतक्यासाठीच दिली की पाकिस्तानातील हिंदू आणि भारतातील मुसलमान या दोन्ही जमातींच्या भूमिकेतील आणि प्रवृत्तीतील फरक नीट समजून घेतला जाणे आवश्यक आहे. पाकिस्तानात हिंदूंच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आर्यसमाज, हिंदुमहासभा या संस्था फाळणीनंतर अस्तित्वात नाहीत. काँग्रेस ही एकमेव राजकीय संस्था तेथे अस्तित्वात राहिली आणि तिने हिंदूंपुरता विचार करण्याचे टाळलेले आहे. तथापि या काँग्रेसला सतत हिंदू काँग्रेस म्हणून हिणवण्यात आले. काँग्रेसने फाळणीला विरोध केला आणि म्हणून पाकिस्तानातील हिंदू जनता फाळणीला आणि पाकिस्तानला विरोध करीत होती याचा पाकिस्तानी राज्यकर्त्यांना राग असणे आपण समजू शकतो. प्रश्न तेथील हिंदूंना नव्या राष्ट्रवादाशी जुळते घेण्यासाठी

पाकिस्तानची उद्दिष्टे /१०५