पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनुकूल राजकीय वातावरण निर्माण करण्याचा होता. ही संधी त्यांना कधीही देण्यात आली नाही. त्यांची मागणी साधी होती. आपल्यालादेखील या राष्ट्रवादाचे सन्माननीय घटक म्हणून वागता यावे असे पाकिस्तानी राष्ट्रवादाचे स्वरूप विशाल बनवा एवढेच त्यांचे म्हणणे होते. याकरिता आपले वेगळे मतदारसंघ रद्द करून घेण्याची किंमत देण्याची त्यांनी तयारी दर्शविली. (आपल्याला वेगळे मतदारसंघ हवेत अशी मागणी करणाऱ्या भारतीय मुसलमानांचा अलगपणा येथे नजरेत भरतो. त्यांच्या दृष्टीने त्यांना कसलीही किंमत द्यायची नव्हती. फाळणीपूर्व भूमिकेप्रमाणेच सवलती मागण्याची जबाबदारी तेवढीच आपली आहे असे ते मानीत राहिले.) त्यांनी सवलती मागण्याचे राजकारण केले नाही आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी निदर्शने व आंदोलने करून दडपण आणण्याचा प्रयत्नही केला नाही. आणि झालेल्या असंख्य दंगलीत त्यांनी एकदादेखील आगळीक केल्याचे दिसून आलेले नाही. परंतु पाकिस्तानच्या राष्ट्रवादाचे अधिष्ठान मुस्लिम समाजापुरते मर्यादित असल्याने जुळते घेण्याच्या हिंदूंच्या या प्रयत्नांना कोणतेच यश येऊ शकले नाही. आयूबखान १९६४ च्या ऑगस्टमध्ये डाक्का येथे केलेल्या भाषणात म्हणाले, “हिंदू आणि मुसलमान यांच्या श्रद्धा इतक्या भिन्न आहेत की त्यांचे एक राष्ट्र बनविणे अशक्य आहे." डाक्का येथील 'अमरदेश' या हिंदू मालकीच्या पत्राने या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, "बऱ्याच दिवसांनी आम्ही इतके मोकळे निवेदन ऐकले. आम्हाला ते अप्रिय वाटले असले तरी त्यात संदिग्धता नाही, ही आम्ही स्वागतार्ह बाब मानतो. देशातील ८० टक्के लोक उरलेल्या २० टक्क्यांना असे सांगत असतील की त्यांचे वेगळे राष्ट्र आहे, तर मग अल्पसंख्यांकांपुढे ते मान्य केल्याशिवाय, स्वतःला वेगळे संघटित केल्याशिवाय गत्यंतर नाही. पाकिस्तानच्या स्थापनेनंतर आम्ही एवढीच मागणी केली की आम्हाला अल्पसंख्यांक म्हणून नव्हे तर पाकिस्तानी म्हणून समजण्यात यावे. आम्हाला फक्त नागरिकत्वाचे आणि घटनात्मक अधिकार पाहिजे होते आणि राष्ट्रीय एकात्मता घडून यायला हवी होती. परंतु पाकिस्तानात संयुक्त राष्ट्र निर्माण करणे अशक्य आहे हे आता स्पष्ट झाले आहे. आमच्यासमोर वेगळ्या इस्लामिक राष्ट्रवादाचे आणि वेगळ्या हिंदू राष्ट्रवादाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे." (पहा - "Let Pakistan speak for herself, Publication Division, Govt. of India, pp.17.)

 तरीही पाकिस्तान आपण हिंदू अल्पसंख्यांकांना न्यायाने वागवितो असे सांगत आले. हे सांगणे पाकिस्तानला सोपे गेले याचे कारण हिंदूंचा आवाजच पाकिस्तानात उठत नव्हता. त्यांना राजकीयदृष्ट्या संघटित होऊ न देण्याची सरकारने खबरदारी घेतली होती आणि अखेर पाकिस्तानातून किती हिंदूंनी स्थलांतर केले यावरून जग पाकिस्तानच्या बहुसंख्यांक जनतेचे आणि राज्यकर्त्यांचे वागणे कसे होते हे ठरवीत नव्हते. दंगली अनेकदा दोन्ही देशांत एकदमच व्हायच्या आणि भारतातील दंगलींवर, मग त्या जातीय असोत वा भाषिक असोत, जगाच्या वृत्तपत्रांतून चिंता व्यक्त केली जायची. पाकिस्तानातून हिंदूंची संख्या जशी घटत गेली तसे दंगलींचे प्रमाणही कमी होत गेले. जवळजवळ ९० टक्के उच्चवर्णीय हिंदू पूर्व बंगालमधून भारतात आले. उरलेले कनिष्ठ जातींचे पाकिस्तानच्या मुसलमानांचे मैले उपसण्यासाठी राहणे पाकिस्तानला आवश्यकच होते. पाकिस्तानने सर्व हिंदूंना घालविलेले नाही, कारण तसे

१०६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान