पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नेहरू-लियाकत करार होय.
 या कराराची पार्श्वभूमी म्हणजे पूर्व बंगालमध्ये झालेल्या भयानक दंगली होत्या हे मी आधी म्हटले आहे. या दंगलींचे स्वरूप केवढे प्रचंड होते याची कल्पना पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात तेव्हा असलेले एकमेव हरिजन हिंदू मंत्री श्री. जोगेंद्रनाथ मंडल यांनी लियाकतअली खान यांना लिहिलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या पत्रावरून दिसून येते. हिंदंना नोकऱ्या देऊ नयेत असे पूर्व बंगाल सरकारने परिपत्रक काढले होते, ही माहितीही या पत्रात उजेडात येते. (पहा - 'Jurists' Commission Report') केवळ याच दंगलीत सुमारे वीस लाख हिंदू भारतात आले. नेहमीप्रमाणे सक्तीची धर्मांतरे झाली.

 नेहरू-लियाकत करारात निर्वासितांना परत यायला अनुकूल वातावरण निर्माण करणे, त्यांची मालमत्ता परत करणे, सक्तीची धर्मांतरे बेकायदा ठरविणे इत्यादी तरतुदी होत्या. अशा प्रकारचा, धर्मस्वातंत्र्याची घोषणा करणारा हा पहिला करार नव्हता. फाळणी झाल्यानंतर वरकरणी समानतेचे आणि स्वतंत्रतेचे युग आणण्याच्या घोषणा जीना आणि लियाकतअली नेहमी करीत आले. निर्वासितांच्या मालमत्तेसंबंधी त्यांनी कशी फसवणुकीची भूमिका घेतली हे आपण पाहिलेच. सक्तीच्या धर्मांतराचा प्रश्नदेखील या संदर्भात पाकिस्तानी नेत्यांच्या अंतरंगावर प्रकाश टाकतो. पाकिस्तानात तसेच भारतातही सक्तीची धर्मांतरे झाली. भारतात अलवार आणि भरतपूर राज्यांत मेयो मुसलमानांना सक्तीने हिंदू करण्यात आले. परंतु अनेक काँग्रेसजनांनी, तसेच गांधीवाद्यांनी, त्यांतील बहुसंख्यांक मेयोंना त्यांच्या जुन्या धर्मनिष्ठा पुन्हा बाळगता याव्यात असे अनुकूल वातावरण तयार केले. परंतु पाकिस्तानात धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदू धर्म पाळता यावा म्हणून कोणतेच प्रयत्न सरकारी व बिनसरकारी पातळीवर करण्यात आलेले ऐकिवात नाही. जीनांच्या घटना समितीतील घोषणांचे पुढे या दुर्दैवी हिदूच्या संदर्भात काय झाले? ही धर्मांतरे झाली तेव्हा जीना हयात होते. परंतु जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे पाश्चात्त्य विद्यापीठात शिक्षण घेतलेले जीना आणि लियाकतअली खान मनाने धर्मवादीच राहिल्यामुळे त्यांच्याकडून इतर धर्मीयांना न्याय मिळण्याची अपेक्षा भारतातील भोळसट धर्मनिरपेक्षतावादीच बाळगत होते. उलट लियाकतअली खानांचे पाकिस्तानातील हरिजन आणि खालच्या वर्गाबाबतचे धोरण अनुदार होते. हिंदू निर्वासितांचा भारताकडे ओघ लागला तेव्हा भंग्यांना जाऊ देण्यात आले नाही. श्रीप्रकाश म्हणतात, “मी लियाकतअली खानांना यासंबंधी सांगितले असता ते म्हणाले, “त्यांना मुद्दामच अडविण्यात आले आहे. हिंदू भंगी गेल्यानंतर आमचा मैला कोण उपसणार?" (पहा - 'Birth of Pakistan and After' by Shri Prakash, pp.75 - 76) पूर्वी दंगली नसतानाही बंगालमधून अधूनमधून हिंदू येतच. १९५१ साली दोन लाख आले. असा भारताकडे हिंदू निर्वासितांचा ओघ वाहत राहिला. पाकिस्तानने आपल्या देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षितता वाटावी असे कोणते उपाय केले? त्यांना सन्मानाने राहता यावे म्हणून राजकीय पातळीवर कधीच अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले नाही. एकतर पाकिस्तानचे सरकारी नेते, वृत्तपत्रे आणि सरकारी प्रचारयंत्रणा सतत केवळ भारताविरुद्धच प्रचार करीत राहिली असे नव्हे, तर हिंदू समाज आणि हिंदू धर्म यांची यथेच्छ निंदानालस्ती करीत राहिली. याचा परिणाम

१००/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान