पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही, कमी करून टाकतो. किंबहुना या नाटकाचे अधिष्ठानच नाहीसे करून टाकतो. खाडिलकरांच्या तीन महत्त्वाच्या ऐतिहासिक नाटकांवरील वा. लं. च्या आक्षेपाचे स्वरूप हे असे आहे. शेवटी नाटककार म्हणून खाडिलकरांचे मोठेपण 'मानापमान', 'स्वयंवर', 'भाऊबंदकी', 'कीचकवध' या जास्तीत जास्त यशस्वी नाटकांवरूनच आपण करणार; पण ज्या ठिकाणी खाडिलकरांना जास्तीत जास्त यश आले आहे त्याही ठिकाणी त्यांच्या मर्यादा चटकन आपणास दिसू लागतात.

मतभेदाचे मुद्दे
  वा. लं.नी केलेले खाडिलकरांच्या विविध नाटकांचे मूल्यमापन हे जवळ जवळ मला मान्यच आहे. आणि म्हणून ते मला अत्यंत रसिक व मार्मिक वाटते. पण ज्या ठिकाणी एकूण खाडिलकरांविषयी वा. लं. मते देऊ लागतात त्या ठिकाणी माझा मतभेद आहे. गडकऱ्यांविषयी त्यांच्या मनात एक प्रकारचा राग कुठेतरी आहे ही जाणीव 'खाडिलकर' वाचतानाही सारखी होत राहते. किर्लोस्कर, देवल, खाडिलकर आणि गडकरी या चौघांनाही फार मोठ्या मर्यादा होत्या. या मर्यादा एकूण मराठी नाट्यवाङ्मयाच्याच मर्यादा आहेत ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही; पण प्रत्येकाची काही. सामर्थ्यस्थाने आहेत. किर्लोस्कर, देवल, खाडिलकर यांची सामर्थ्यस्थाने लक्षात घेऊन त्यांच्या मर्यादा वा. ल. विसरतात आणि गडकऱ्यांच्या मर्यादाच लक्षात घेऊन ते सामर्थ्यस्थाने विसरतात, अशी त्यांच्याविषयी माझी तक्रार आहे. वा. ल. म्हणतात, 'गडकऱ्यांच्या नाटकांनी श्रीपाद कृष्णांचे लेखन अगदी निस्तेज करून टाकले; पण त्यांची नाटके खाडिलकरांच्या नाटकांना मात्र निस्तेज करू शकली नाहीत. वा. लं.ची ही भूमिका मराठी रंगभूमीच्या इतिहासात बसणारी नाही. खाडिलकरांचे पहिले महत्त्वाचे नाटक 'कीचकवध' रंगभूमीवर येण्यापूर्वीच कोल्हटकरांचे 'वीरतनय' आणि 'मूकनायक' रंगभूमीवर येऊन गेलेले होते. कोल्हटकरांच्या सर्व आकर्षकतेचे स्वरूप नावीन्य' इतकेच होते. त्यांनी दिलेल्या चाली, त्यांची स्वतंत्र कथानके, त्यात विनोदासाठी राखून ठेवलेली जागा, त्यांनी उडवलेले नटी - सूत्रधाराचे प्रवेश, या नवेपणामुळे कोल्हटकरांना अल्पजीवी लोकप्रियता मिळालेली होती. पण गडकरी आपल्या वैभवाने रंगभूमीवर येण्यापूर्वीच कोल्हटकर निस्तेज झाले होते. कोल्हटकरांची नाटके गडकऱ्यांमुळे

रं....५
नाटककार खाडिलकर