Jump to content

पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवनिर्मिती कितपत शक्य आहे या प्रश्नाचा विचार ते करू लागतात. ही नवनिर्मिती इतिहासाने पुरवलेली माहिती टाळून करता येईल काय? वा. लं.ना असे वाटते. पण असे करता येणार नाही. ऐतिहासिक नाटक किंवा ऐतिहासिक कादंबरीचा आधार काल्पनिक नसतो. इतिहास आपल्यासमोर काही तपशील व दुवे मांडून ठेवतो. हे सर्व तपशील ज्यात सुसंगतपणे एकवटू शकतील अशी व्यक्तिरेखा सिद्ध करण्याचे काम कलावंताचे आहे. त्यात अमूक प्रसंग इतिहासाने सिद्ध केलेला, अगर तमुक प्रसंग इतिहासात न नोंदवलेला या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नाहीत. महत्त्वाची असते सर्व ऐतिहासिक वास्तवाला जिवंत करणारी व्यक्तिरेखा. ऐतिहासिक कलाकृतीत काल्पनिकाचे प्रमुख कार्य हे असे असते. या ठिकाणी काल्पनिक माहितीच्या थरावर असणाऱ्या ऐतिहासिक वास्तवाला अनुभवाच्या मूल्यमापनात वा. लं.नी स्वीकारलेला हा दृष्टिकोन पुन्हा त्यांच्या एकूण मीमांसेशी मिळताजुळताच आहे. सामाजिक वाङ्मयकृतीला जर सामाजिक वास्तवाचा आधार लागत असेल तर ऐतिहासिक वाङ्मयकृतीला इतिहासकालीन वास्तवाचा आधार सोडून चालणार नाही.

केशवशास्त्री पात्रावर आक्षेप
 म्हणूनच खाडिलकरांनी 'सवाई माधवरावचा मृत्यू' या नाटकात निर्माण केलेल्या केशवशास्त्री या पात्रावर त्यांचा आक्षेप आहे. शेक्सपिअरचा हॅम्लेट आणि त्याचा यागो एका नाटकात आणल्याबद्दलची स्तुती पुष्कळ करून झाली आहे. या घटनेचे कौतुक वा. ल. करू शकत नाहीत. केशवशास्त्री हे पात्र निर्माण केल्यामुळे नाट्याचे ऐतिहासिकत्व विटाळले गेले. नाना फडणिसांच्या माथी हतबल राजकारण व निष्काळजीपणा आणि कर्तृत्वशून्यता हा डाग विनाकारण बसला व केशवशास्त्र्यांच्या नानाविध लीलांनी सारे नाटक डागाळून गेले, त्याची एकात्मता ढासाळली असे वा. लं. ना वाटते. केशवशास्त्री या नाटकात येणे ही गोष्ट नाट्याला उपकारक ठरली नसून मारक ठरली आहे. हीच गोष्ट 'भाऊबंदकी' बाबतसुद्धा म्हणता येईल. या नाटकात न्यायनिष्ठुर रामशास्त्र्यांनी राघोबाला देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा फर्मावणे या घटनेला म्हाळसा आणि दुर्गा यांच्या ओढाओढीत योगायोगाने रामशास्त्र्यांच्या हाती हुकूमनामा पडणे या योगायोगाचाच आधार आहे. हा सगळा योगायोग रामशास्त्र्यांची उंची वाढवीत

६४/ रंगविमर्श