पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुंगीत पाहावयाचे हे नाटक आहे. ज्याप्रमाणे परिकथा वाचताना डोंगरांना पंख असू शकतात; ससे मानवी भाषेत बोलू शकतात हे माणसाला गृहित धरूनच चालावे लागते तसे 'मानापमाना'चे आहे. या नाटकाची एकूण प्रकृतीच हलक्याफुलक्या सुखद नाट्याभासाची आहे. ज्यामुळे स्थूलपणा, नाटकीपणा, अस्वाभाविकपणा हे सगळेच या ठिकाणी गुण होऊन येतात. या नाटकातील काव्य, संभाषणातील कल्पनाविलास या साऱ्यांचे स्वरूप बेगडी आणि उथळ आहे; पण हा बेगडीपणाच या ठिकाणी गुण ठरतो. उलट खरी भावनाप्रधानता या नाटकात दोषरूपच ठरली असती. नाट्याची प्रकृती लक्षात घेऊन 'मानापमाना'चे केलेले विवेचन इतके मार्मिक व त्या नाट्याच्या रहस्याच्या अचूक शोध घेण्याचे विवेचन हे मराठीत पहिलेच आहे.

स्वयंवराकडे पाहण्याची दिशा चुकली
 'मानापमान'च्या अगदी उलट प्रकार स्वयंवर नाटकाचा घडलेला आहे. 'स्वयंवर' नाटकाकडे बालगंधर्वांच्या प्रमुख भूमिकेभोवती उभे केलेले एक संगीतप्रधान नाटक म्हणूनच पाहण्याची सवय प्रत्येकाला आहे. 'स्वयंवर' म्हटले की रुक्मिणीचा ‘दादा ते आले'हा रंगभूमीवर होणारा प्रवेश, 'खडा मारायचाच झाला तर' या प्रवेशातील स्वप्नाळू शृंगार, यांची आठवण सदैव होत राहते. प्रयोगाच्या रंगतदारपणामुळे या नाटकातील गंभीर नाट्याकडे सर्वांचेच पार दुर्लक्ष झालेले होते. 'मानापमान'कडे गंभीर नाटक म्हणून पाहणे ही पहिली चूक आणि 'स्वयंवराकडे' संगीताची मेजवानी म्हणून पाहणे, लडिवाळ शृंगाराने ओथंबलेले नाटक म्हणून पाहणे ही दुसरी चूक अशा दोन्ही चुका मराठीत झालेल्या आहेत. मला असे वाटते की स्वयंवराकडे पाहण्याची सगळी दिशाच चुकली याचे कारण 'सौभद्र' हे नाटक आहे. 'सौभद्र'च्या संदर्भातच स्वयंवराकडे पाहण्याची सवय प्रायोगिक रंगभूमीमुळे व प्रयोगामुळे लागली. त्यामुळे या नाट्यातील रुक्मिणीचे विविध पातळीवरचे स्वभावरेखन, तितकीच प्रभावी अशी श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा याकडे समकालीन टीकाकारांचे लक्षच जाऊ शकले नाही. पुराणात असणारी व प्राचीन मराठी कवींनी रंगविलेली रुक्मिणी-स्वयंवराची कथा आणि खाडिलकरांच्या 'स्वयंवर' नाटकातील नाट्य यांचे स्वरूप परस्परांपेक्षा अगदी भिन्न आहे. प्रेमविव्हल झालेल्या रुक्मिणीची

६०/ रंगविमर्श