पान:मी भरून पावले आहे.pdf/216

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खरं नाही. बऱ्याच मुसलमानांनी दहन करवून घेतल्याची उदाहरणं आहेत. जसे छगलासाहेब, इस्मत चुगताईबाई, एम.आय.ए.बेगसाहेब, हिदायतुल्लासाहेब इत्यादी.
 दुसरी गोष्ट अशी, मेल्यानंतर दहन करायचं का दफन करायचं किंवा आपलं शरीर हॉस्पिटलला दान द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे आणि तो अधिकार आम्ही मानतो. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते नमाज पढणारे आहेत, रोजे ठेवणारे आहेत, कुराणाचे पठण करणारे आहेत, आस्तिक आहेत. आमच्या घटनेमध्ये मंडळाचा सभासद होण्याकरता नास्तिक असण्याची जरुरी नाही. शरीयत कायदा टाकाऊ म्हणणारे प्रा. फैजी हे धार्मिक होते. पण ते आपला धर्म आपल्या घरात आणि मशिदीत पाळीत. तेव्हा हमीद दलवाईंनी दहन करून घेतलं हे त्यांच्या वैयक्तिक मताप्रमाणे झालं. कारण त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीमुळे सर्वच पारंपरिक धर्मांनी सांगितलेल्या स्वर्ग, नरक, पुनर्जन्म या कल्पना किंवा मरणोत्तर जीवन यावर दलवाईंनी कधीही विश्वास ठेवलेला नाही आणि ते स्वतःला मुसलमानच म्हणवून घेत असल्यामुळे पारंपरिक इस्लाममधील दफन करण्यामागे असलेली भूमिका त्यांना नाकारायची होती. म्हणून त्यांनी त्या पद्धतीने आपलं शरीर कबरीमध्ये न पुरता त्याचं दहन करावं असा निर्णय घेतला. मात्र मला असं वाटतं की दलवाईंची मानवतावादी भूमिका पाहाता त्यांना अजून काही आयुष्य लाभलं असतं तर त्यांनी आपलं शरीर दफन वा दहन न करता देहदानच केलं असतं. दुर्दैवानं त्यांना ती संधी मिळाली नाही. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची, दहन करून घ्यावं किंवा घेऊ नये अशी कोठलीच भूमिका नाही. या बाबतीत प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क आम्ही मान्य करतो. दलवाईंच्या दहनाचा उपयोग आम्हांला बदनाम करण्याकरता केला जातो म्हणून हा खुलासा.
 दलवाई राजकारणी माणूस नव्हता. पण त्यांना राजकारण चांगलं समजत होतं. त्या क्षेत्रात गेले असते तर त्यांनी उत्तम राजकारण केलं असतं. पण त्यांना समाजकार्याची आवड होती. त्याचं महत्त्व त्यांना कळत होतं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं होतं की आपले राजकीय विचार मंडळाच्या कामामध्ये आणता कामा नयेत. म्हणून ते राजकारणापासून स्वतःही दूर राहिले. आम्ही मुसलमानांमध्ये प्रबोधनाचं काम करतो. मुस्लिम महिलांचे प्रश्न म्हणजे

मी भरून पावले आहे : २०१