पान:मी भरून पावले आहे.pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळ्यांना म्हणजे कुणाला? एक पवारांना दिलं, एक शहासाहेबांना गेलं, एक नगरकरांना, एक तळवलकरांना आणि एक विल आमच्याकडे राहिलं. ऑफिशिअली झालं सगळं हे. आता हे विल जे झालं त्याची अफवा फैलली गावापर्यंत. आणि वाद चालला की हमीदखानकडे पैसा नसताना विल करण्याचा त्याला अधिकारच नाही. प्रॉपर्टी असल्याशिवाय माणसाला विल करण्याचा अधिकारच नाही, आणि सगळ्यांना माहिती होतं की तो विल वेगळं काही तरी करेल. आणि त्यांना ते नको होतं. त्यामुळे त्यावर खूप वाद झाले.
 ते जिवंत असतानाच वाद चालले होते की हे विल तो करू शकणार नाही. त्यांच्यासमोर कोणी बोलत नव्हतं. मागून प्रेशर यायचं का हे विल काढून घ्या. महंमददा आमच्या बाजूचे होते, म्हणून लोकं त्यांच्यावर चिडले होते. हमीदचा चमचा आहे, काकीचा चमचा आहे, असं म्हणायचे. त्याच्यानंतर परत लोकं यायची गाववाली, खायला आणायची, प्रेम होतं त्यांच्यावर, सगळेच काही विरोधक होते असं मला म्हणायचं नाही. आणि काही २-४ लोकं होती ती जमात बसवायची वारंवार. त्यांची नावं मी सांगत नाही, पण तिचं काम अजूनसुद्धा आहे. त्याचं कामच ते. जमातीमध्ये काही तरी असेच प्रॉब्लेम आणायचे. याला वाळीत टाक, त्याला वाळीत टाक. ही जमात वेगळी कर, ती जमात वेगळी कर. याच्याविरुद्ध कर, त्याच्याविरुद्ध कर, हे धंदेच त्यांचे. त्यामुळे यांच्यावर कारवाई करणार. त्यांना पाहावत नसे. हे पुढारलेले त्यामुळे ते त्याच पद्धतीने ह्यांच्याशी वागायचे. आणि हे ह्यांना माहिती होतं. पण ते त्यांना वाईटही म्हणायचे नाहीत. समोर आल्यावर एका ताटातसुद्धा खायचे ते. गावात हे पॉलिटिक्स नेहमीच चालू असतं. गावात आमचे प्रोग्रॅमपण व्हायचे. एकदा तर हे असताना एक प्रोग्रॅम झाला होता चिपळूणला काळे हॉलमध्ये. सकाळी प्रोग्रॅमला आम्ही जाणार, तर रात्री दगडफेक झाली आमच्या घरी, पोलिसचा पहारा ठेवायला लागला, घरातून निघायची मारामार झाली आम्हांला. अशी दगडफेक, असा त्रास दिला आम्हांला त्यांनी, का ती मीटिंग-प्रोग्रॅम सुरू होईपर्यंत आम्हांला बस बस झालं. तरी तशा परिस्थितीत काही लोक आले. प्रोग्रॅम झाला. घरी आले. तसंसुद्धा गावामध्ये होत होतं. सगळे पॉलिटिक्स खेळायचे अशा रीतीनं. हेतू होता, की त्यांना गावाला न्यायचं, त्यांना पुरायचं आणि त्यांच्या कामावर बंधन घालायचं, असं असणार काही तरी. पण विलला त्या खूप विरोध झाला.

 दोन महिने अगोदर मी म्हणाले, का बाबा, तुमचं काही झालं तर कुणाला फोन करून बोलवायचं?

मी भरून पावले आहे : १३९