________________
आगष्ट १८९९] माधवनिधन. बाजीरावसाहेब डोळ्यापुढे असावेत, असंच श्रीमंत पंतप्रधानास वाटेल. पण तें सर्व हळू हळू होईल. एकदम होणार नाही. कारण एकदम कशीही बदल होणं इष्ट नाही. ती लोकांच्या तेव्हांच नजरेस येईल. हळु हळु वाढणाऱ्या रोगानं एकदां सर्व शरीर व्यापून टाकलं ह्मणजे मग तो जसा असाध्य होतो, आणि त्याच्यापुढे मग जशी कोणाची मात्रा चालत नाही, तसं हे होणार. आणि तेवढ्याच करितां हे असं केलं आहे. हे श्रीमंतांच्या आलंना ध्यानांत? बाजीराव-हो, आलं! वैजनाथ–जोपर्यंत हे ताईत त्यांच्याकडे गेले नाहीत, तोपर्यंत श्रीमंतांनी हे आपल्याजवळ ठेवावेत. दुसऱ्यावर कधीही विसंबू नयेत. हे अगदी जिवाच्या विश्वासूक मनुष्याच्या हातून पोहचतील असें करावे. हे जर भलत्याच्या हाती लागले, तर मात्र काय परिणाम होईल ते मला सांगता येत नाही. . बाजी०-नाही, अशा भलत्या सलत्या मनुष्याच्या हाती मी ही अशी अमोल्य वस्तु कधीच देणार नाही, याविषयी आपण खात्री ठेवा. वैज०–श्रीमंतांसारख्या सुज्ञांस जास्त सांगणे नको. बरें आहे आतां श्रीमंतांनी यावं ! रात्रही फार झाली. कोणी भलत्या मनुष्यानं आपल्याला येथं एकटं पाहिलं ह्मणजे आणखी पंचाईत! बाजी०-( त्याच्यापुढे मोहरा ठेवून नमस्कार करतो. ) आजच्या महा पूजेची ही दक्षिणा. बिदागी वाड्यांत आल्यानंतर होईल. उद्यां तिकडेच या. वैज०-ठीक आहे. बाजी०-( आपल्याशी ) आता हे रावाच्या हाती माधवरावाकडे पाठविले झणजे मी कृत्यकृत्य झालो. (जातो. ) वैज०-( आपल्याशी) आतां मला देखील काही तरी निमित्य काढून लवकर येथून निसटलं पाहिजे. नाही तर सर्वच ढोंग बाहेर यायचं ! झांकली मूठ आहे तोपर्यंतच सर्व ठीक आहे. यंदाची भिक्षुकी पाहून आमच्या तिला असा आनंद होईल ह्मणतां, की बोलायची सोय नाही. गरिब स्थितीतील मनुष्याला प्रपंच्याकरितां अशा सतरा हजार उलाढाली कराव्या लागतात ! (जातो.)