पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३०५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि हरयाणातल्या लोकांचे किंवा अन्य कोणत्याही राज्यातील लोकांचे दुःख काही वेगळे नाही. मी हरयाणात गेलो तर ते काही असे म्हणत नाहीत की तुम्ही आमच्या भाषेत बोलले पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हरयाणाच्या मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा करतात की हरयाणातल्या मराठी माणसाचे संरक्षण कसे व्हावे ही गोष्ट आकलनाच्या पलीकडची आहे. ज्या राज्याने सबंध देशात राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवली, ज्या राज्याने स्वातंत्र्यलढ्यात सगळ्यात जास्त हुतात्मे दिले, ज्या राज्याने सगळ्यात थोर नेते दिले त्या महाराष्ट्र राज्याने जर का मराठी भाषक आणि बिगरमराठी भाषक असे वाद घालायला सुरुवात केली तर असे वाद घालणाऱ्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे, की आपला महाराष्ट्र भारत देशात ठेवायचा आहे का वेगळा करायचा आहे. असा विचार करून मग मराठी, बिहारी, उत्तर प्रदेशी असे वाद घाला. गेल्या सव्वीस वर्षांत आपली शेतकरी चळवळ देशभर पसरली, प्रत्येक राज्यात आपल्याला सख्ख्या भावांसारखे शेतकरी नेते आणि कार्यकर्ते मिळाले. त्यांचे आणि आपले शत्रुत्व कसे काय होऊ शकते? या वादाचाही सोक्षमोक्ष लावायची आवश्यकता आहे.
 आणखी एक वाद सुरू झाला आहे. मालेगावला बाँबहल्ला झाला. त्याचा पोलिस तपास ज्या तऱ्हेने होतो आहे त्यावरून असे वाटू लागते की बाँबहल्ल्यांचा शोध लावताना काही वेळा जाणीवपूर्वक आपल्याला यावेळी सूत्रधार मुसलमानच शोधायचा आहे असे ठरवून शोध केला जात असावा आणि मुसलमान आतंकवाद्यांची यादी खूप मोठी झाली आता आपण हिंदू शोधून काढू या असाही विचार केला जात असावा. हे खरे का खोटे हे इतिहासच ठरवील; पण असा राजकारण्यांचा डाव असावा अशी शंका मनात डोकावतेच.
 पण, त्याहूनही धोक्याची गोष्ट जी शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे की जर का लष्करातील उच्च अधिकारी आतंकवादाकडे वळत असतील, आणि लष्करातील साधेसुधे जवान काश्मीरच्या आघाडीवर लष्कराची नोकरी करण्यापेक्षा जीव दिलेला बरा म्हणून आत्महत्या करीत असतील तर सरकारने नीट विचार केला पाहिजे की त्यांचे जे अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे धोरण आहे; त्याहीपुढे बहुसंख्याक शेतकरी मेले तरी चालेल, बहुसंख्याक हिंदू मेले तरी चालेल पण दलित, आदिवासी आणि मुसलमान हे अल्पसंख्याक घटक असंतुष्ट राहता कामा नये असे जे धोरण आहे त्यामुळे बहुसंख्याकांमध्ये असंतोष पसरून तर असे होत नाही ना? हे असे चालत राहिले तर याचा धोका संपूर्ण देशाला होऊ शकतो त्यावर सरकारने गंभीरपणे विचार करायला पाहिजे.
 पोशिंदा अतिरेकी बनत नाही

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३०५