पान:माझे चिंतन.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी ३७ 

 स्त्रीपुत्र, आप्तइष्ट हे मोक्षाच्या आड येतात असे वाटताच त्यांचा संबंध तोडावा, त्यांच्याविषयी उदासीन व्हावे असे येथले धर्मधुरीण शिकवू लागले. कोणतेही कृत्य करताना कुटुंबहित दृष्टीसमोर ठेवावे हेसुद्धा जेथे मान्य नाही, किंवा तसे न करण्यातच जेथे भूषण मानले जाते, तेथे समाजहित दृष्टीपुढे ठेवण्याची जाणीव कशी निर्माण होणार ? राजकारणातही हेच झाले. आजही कोणी कोणी जुन्या काळाचे अभिमानाने वर्णन करतात, की आमची ग्रामव्यवस्था अशी स्वयंपूर्ण होती की तिकडे राज्यकारभारात कसल्याही उलथापालथी होवोत, शेतात नांगर धरणाऱ्या शेतकऱ्याला त्याची दखल नसे. पहिले राज्य जावो, दुसरे येवो, राजा स्वकीय असो, परकीय असो, आमच्या शेतकऱ्याच्या व त्याच्या भोवताली असणाऱ्या कुंभार, लोहार, साळी, माळी, सोनार यांच्या जीवनाशी त्याचा कसलाही संबंध येत नसे. याचा अर्थ असा, की आमच्या वैयक्तिक जीवनाच्या आखणीत सार्वजनिक जीवनाच्या विचाराला स्थान नव्हते; इतकेच नव्हे, तर तसे नसण्यात आपण भूषण मानीत होतो.

सांघिक जीवनाच्या गुणांची कमतरता

 वैयक्तिक जीवनात परमोच्च बिंदू गाठण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असताना सांघिक जीवनात आम्ही सर्वत्र नामोहरम होतो ही दुःखद स्थिती म्हणजे आपल्या पूर्वीच्या तत्त्वज्ञानाचा परिपाक आहे. गेल्या शंभर वर्षांत ही स्थिती पुष्कळच सुधारली आहे; पण अजूनही आपल्या अनेक योजनात आपल्याला जे अपयश येत आहे त्याचे, पंडितांच्या मते, प्रधान कारण असे की योजना कार्यवाहीत येत असताना अखिल भारतीय प्रपंचाची दृष्टी कार्यकर्त्यांच्या अवलोकनात नसते. स्वातंत्र्यानंतर प्रारंभीच आखलेल्या प्रांतविकास योजनांवर टीका करताना डॉ. ग्यानचंद यांनी भिन्न प्रांतांत भिन्न कार्यकर्त्यांत, योजनेच्या भिन्न विभागांत सहकार्य नाही, एकसूत्रता नाही, परस्परसंगती नाही, अंतिम साध्याविषयी एकवाक्यता नाही, याच दोषांवर सारखा भर दिला आहे. एके ठिकाणी तर त्यांनी म्हटले आहे, की भिन्न खात्यांत एकसूत्रता व सहकार्य घडवून आणण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती तिच्या कामातच सुसंगती नव्हती !
 कार्याचे धोरण आखताना अखिल भारताचे चित्र कोणाच्याच डोळ्यांपुढे नसते हा ग्यानचंद यांचा मुख्य आरोप आहे. आणि या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना