पान:माझे चिंतन.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ३६ माझे चिंतन

स्वच्छता आणावी ही कल्पना आमच्या मनात उद्भवतच नाही; ते आमच्या इतिहासातच नाही.
 मुंबईच्या उत्तम इमारतीतून अगदी आजच्या घटकेलासुद्धा हे किळसवाणे दृश्य दिसते. इमारतीच्या मध्ये असलेल्या चौकात वाटेल ती घाण टाकलेली असते. अगदी चौथ्या, पाचव्या मजल्यावरून आमटी, वरण, निःशंकपणे खाली ओतून देतात. शाळा-कॉलेजांतल्या कन्यका केशरचना करीत असताना, केस स्वच्छ करीत करीत त्यातला केरकचरा त्या चौकात टाकीत असतात. ब्रशाने तोंड धुणारे लोक गॅलरीतच शेजारी उभे राहून, मुखाची स्वच्छता करीत असतानाच खाली मुखरस टाकीत असतात. ती जागा एकट्या कोणाची नाही; सर्वांची आहे. पण म्हणून ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वाची आहे असे न मानता, तेथे घाण करण्याचा हक्क मात्र सर्वांचा आहे, अशी श्रद्धा नागरिक बाळगतात ! या इमारतीतील बिऱ्हाडे आतून अगदी स्वच्छ असतात; पण दोन बिऱ्हाडांचा जेथे संबंध येतो, तेथे घाण साचलेली असते. वैयक्तिक जीवन आम्ही स्वच्छ ठेवू; पण सार्वजनिक जीवन हक्काने घाण करू !
 कोणतेही कृत्य करताना, कोणतेही धोरण ठरविताना आपल्या अखिल समाजाचे चित्र डोळ्यांपुढे ठेवावे, अखिल समाजाच्या जीवनाचे आपण अंशभागी आहो ही जाणीव मनात ठेवावी, असा संस्कार भारतीय मनावर गेल्या सातशे- आठशे वर्षांत झालेलाच नाही. ब्रिटिश राज्य येथे आल्यानंतर ही कल्पना प्रथम वातावरणात निर्माण झाली. त्याच्या आधीच्या काळात आपण एकमेकाशेजारी एका भूमीवर राहात होतो इतकेच. त्या सहवासाने आपल्यामध्ये सहजीवन, सामुदायिक जीवन निर्माण झाले नव्हते. याचे कारण असे, की धर्म, राजकारण इत्यादी सामाजिक जीवनाच्या भिन्न क्षेत्रांतील भारतीयांचे तत्त्वज्ञानच सर्व व्यक्तिवादी होते. धर्मामध्ये मोक्ष हे आमचे अंतिम प्राप्तव्य होते. त्या मोक्षधर्माला व्यक्तीच्या त्यागाची, संयमाची, तपश्चर्येची अत्यंत आवश्यकता असते. पण सामाजिक गुणांची त्याला काडीइतकीही जरूर नाही. मोक्ष प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे मिळवावयाचा असतो, त्यासाठी संघटनेची मुळीच आवश्यकता नाही. पाच- पंचवीस, पाचशे, हजार असे लोक एकत्र येऊन मोक्षधर्म साध्य करावयाचा नसतो; ते अगदी एकट्याचे, अगदी वैयक्तिक कार्य आहे. त्यामुळे आपले सर्व निकष, सर्व मूल्यमापन तसे होऊन बसले आहे.