पान:माझे चिंतन.pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १४  माझे चिंतन

किंवा विष घालीन. मात्र हा बेत आपण सर्वथा गुप्त ठेविला पाहिजे. '
 असे अत्यंत हीन व ओंगळ कारस्थान करण्यात, आणि हिंदवी स्वराज्याची संस्थापना करण्याची आकांक्षा धरणाऱ्या क्षत्रियकुलावतंस श्रीशिवछपत्रतींविरुद्ध ते कारस्थान रचण्यात काही धर्मभ्रष्टता आहे, असे मिर्झा राजे जयसिंग यांनी स्वप्नातही मान्य केले नसते. हे सर्व प्रकार घडल्यावर त्यांना जर कोणी म्हणाले असते की, 'राजे, तुम्ही धर्मभ्रष्ट आहा, हिंदुधर्मावर तुमची श्रद्धा नाही. तुम्ही स्वधर्माची सेवा करीत नाही, तुम्ही धर्मद्रोही आहा'. तर त्यांना पराकाष्ठेचा विस्मय वाटला असता, संताप आला असता. हिंदुधर्माचा व शिवाजीवर चालून जाण्याचा संबंध काय? औरंगजेबाचे सर्व प्रयत्न इस्लाम धर्माच्या अभिवृद्धीसाठी चालू आहेत हे न जाणण्याइतके मिर्झा राजे दूधखुळे नव्हते. छत्रपतींनी दिल्लीला बादशहाच्या भेटीसाठी जाण्याचे मान्य केल्यावर त्यांना बादशहाने जे पत्र धाडले त्याच्या मायन्यात त्याने छत्रपतींना 'मुसलमानीधर्मरक्षक शिवाजीराजे' असे संबोधिले आहे. राजे जयसिंग यांना औरंगजेबाच्या या सर्व आकांक्षा माहीत होत्या. तरीही त्याच्या तख्ताशी एकनिष्ठ राहण्यात आपण धर्मद्रोहीपणा केला असे त्यांना कधीच मान्य झाले नसते.
 ' आपली हिंदुधर्मावर श्रद्धा आहे हे सिद्ध करा. ' असे त्यांना कोणी हटकले असते तर त्यांनी काय पुरावा दिला असता ? त्यांनी वाटेल तेवढा पुरावा दिला असता. त्यांनी त्या हटकणाऱ्याला आपल्या वाड्यात नेऊन सांगितले असते की पाहा, येथे भगवान् एकलिंगजीची रुद्राभिषेकाने नित्य पूजा चालू आहे, माझ्या वाड्यात नित्य ब्राह्मणभोजने चालू आहेत, अग्नीमध्ये मी नित्य आहुती देतो, मी कितीतरी गाई पाळलेल्या आहेत, त्यांचे मी नित्य दर्शन घेतो, एकादशी, सोमवार हे उपास चुकू देत नाही; गंध, शेंडी, घेरा ही हिंदुत्वाची लक्षणे मी अभिमाना धारण करतो, जन्मापासून मरेपर्यंत आमच्या घरात सारे संस्कार हिंदुपद्धतीने होतात. काशी, रामेश्वर, पुष्कर, सोमनाथ या यात्रा मी करतो. गंगा, यमुना या नद्यांना घाट मी बांधले आहेत. तेथे कोटी लिंगार्चन व्हावे म्हणून मी जमिनी दिल्या आहेत. हे व या तऱ्हेचे शेकडो आचार मी पाळीत असताना माझी हिंदुधर्मावर श्रद्धा नाही, मी हिंदुधर्माची सेवा करीत नाही, असे तुम्ही म्हणता याचा अर्थ काय ?