पान:माझे चिंतन.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चौथ्या दशांशाची दक्षता ! १४१ 

नव्या घटकाचा शोध लागला. चुका होत होत्या त्या त्यामुळे होत होत्या.
 ही जी शास्त्रज्ञांची काटेकोरी, सूक्षतम मोजमापे घेण्याची, पुनःपुन्हा तपासून पाहण्याची वृत्ती, चौथ्या दशांशाच्या चुकीचीही उपेक्षा न करण्याबद्दलची सावधता ती सध्याच्या युगात सर्व जीवनात येणे अवश्य आहे. त्यावाचून आमचे सार्वजनिक कारभार घड्याळाप्रमाणे सुयंत्र होणे अशक्य आहे. ही वृत्ती, ही सावधता आपल्या ठायी आहे का, हे आमच्या विद्यार्थ्यांनी तपासून पाहावे. एकदा पास म्हणून जाहीर केल्यावर एस. एस. सी. बोर्डाचे किंवा विद्यापीठाचे मागून नापास म्हणून पत्र आले, किंवा ८५ ऐवजी ५५ गुण मांडले तर विद्यार्थ्यांना संताप येतो; पण ज्या कारकुनांनी या चुका केल्या ते दोनतीन वर्षांपूर्वी असेच विद्यार्थी होते. त्यांचे पेपर तपासताना आम्ही असेच संतापत होतो व सध्याही संतापतो. उत्तरे पुन्हा पुन्हा तपासून चुका राहू नयेत म्हणून दक्षता घेणारे, व्याकरण, भूमिती, विज्ञान यांचे केवळ सिद्धान्त न घोकता मूलज्ञानापर्यंत जाण्याची हौस बाळगणारे, पेपरात विचारलेले प्रश्न व लिहिलेली उत्तरे यांचा थोडासा तरी संबंध असावा असे मत असलेले, बारा वाजता यावयास सांगितले असता साडेबाराला येऊन पुन्हा मुळीच उशीर झाला नाही अशा भावाने न बसणारे असे शेकडा दोन सुद्धा विद्यार्थी सापडत नाहीत. एम्. ए. चे पन्नास पेपर तपासून पाहता असे आढळले की, शब्दांची काही जुळणी म्हणून असते, वाक्यांची घडण असते व परिच्छेदाची काही रचना म्हणून असते याचा कित्येक विद्यार्थ्यांना गंध सुद्धा नाही. 'ध्येयवादी पुरुषाच्या मार्गात स्त्री धोंड आहे असा प्रवाद वामनरावांच्या रागिणीमध्ये भय्यासाहेबांना थिऑसफीचे वेड असते.' 'त्याची तिसरी कादंबरी इंदु काळे व सरला भोळे ही तर विनायकराव, काशी ढवळे पाठक, सरल यांनी आपली जीवित हा आपल्या ध्येयाकरिता वेचली आहेत' अशा तऱ्हेची वाक्ये एम्. ए. च्या पेपरात सापडतात. वाक्यांची ही दशा ! मग विरामचिन्हे, अवतरणे, अनुस्वार यांची काय असेल ? हे पेपर वाचीत असताना दक्षता, सावधता, रेखीवपणा यांचा या विद्यार्थ्यांशी संबंध असावा अशी चुकूनसुद्धा शंका येत नाही. आणि हेच विद्यार्थी एम्. ए. होऊन आता निरनिराळ्या खात्यांत वरचे अधिकारी म्हणून जाणार. हाताखालचे मदतनीस असे असल्यावर पंडित नेहरू, वल्लभभाई किंवा करिअप्पा काय करू शकतील ?
 स्पेन्सरने म्हटले आहे की, शाळेत गणित सोडविताना एखादा आकडा