पान:माझे चिंतन.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विश्वाविरुद्ध १०३ 


तिचे वैशिष्ट्य

 सॉक्रेटिसाच्या या आत्मबलिदानाचा विशिष्ट अर्थ आपण समजून घेणे अवश्य आहे. धर्मासाठी, स्वजनांसाठी, स्वामीसाठी उदात्त भावनेने आत्मबलिदान करणारे लोक, सॉक्रेटिसाच्या आधीही अनेक होऊन गेले असतील; पुढच्या इतिहासात तर निश्चित होऊन गेले आहेत. पण त्या सर्वोहून हे बलिदान निराळे आहे. सॉक्रेटिसाने निर्माण केलेली व रॉजर वेकन, जॉन हस, लूथर, ब्रूनो यांनी पुढे चालविलेली परंपरा त्या परंपरांहून अगदी निराळी आहे. धर्मासाठी किंवा स्वामीसाठी ज्यांनी ज्यांनी प्राण दिले त्यांच्यामागे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षच रीतीने- प्रत्यक्ष देहाने नसतील तर मनाने व सहानुभूतीने,– हजारो लोक उभे होते. त्या त्या व्यक्तींचा समाज किंवा त्यांच्या पक्षाचे लोक यांचा त्यांना बहुधा नेहमीच पाठिंबा असतो. त्यांचे त्यांना धन्यवाद मिळतात. तेथे शत्रूकडून जो आघात होतो तो या सर्व समाजावर होत असतो. त्याचा प्रतिकार सर्वांनाच करावयाचा असतो आणि कृतीने नव्हे तरी निदान मनाने त्या व्यक्तींचे स्वजन त्यांच्या कृत्यात सहभागी असतात. सॉक्रेटिस हा सर्व समाजाविरुद्ध एकटा उभा होता. स्वजनांच्या विरुद्धच त्याचा लढा होता. त्याच्या बाजूला फक्त त्याची विवेकशक्ती होती. त्याला पाठिंबा असलाच तर तो फक्त चार दोन मित्रांचा. त्याच्या समाजाचा नव्हे. श्रीबंदा वीर किंवा श्रीछत्रपती संभाजी यांनी धर्मासाठी मृत्यू पत्करला त्या वेळी अखिल शीख समाज व मराठा समाज या पुरुषांच्या मागे मनाने उभा होता. मुरारबाजी, बाजी प्रभु, तानाजी यांनी आत्मबलिदान केले तेव्हा तर समाज त्यांच्यामागे प्रत्यक्षच उभा होता. म्हणजे ते लढे एक समाज विरुद्ध दुसरा समाज असे होते. सॉक्रेटिसाचा लढा एक व्यक्ती विरुद्ध सर्व समाज असा होता. ते लढे प्रस्थापित झालेल्या, मान्यता पावलेल्या तत्त्वांसाठी होते; हा लढा कोणाला मान्य नसलेल्या सर्वस्वी नवीन व म्हणूनच पाखंडी गणलेल्या अशा तत्त्वासाठी होता. त्या लढ्यांत आत्मबलिदान करणाऱ्या वीरांच्या मागे स्वसमाजाची शक्ती होती. या लढ्यात या व्यक्तीच्या साह्याला फक्त तिच्या विवेकनिष्ठेची शक्ती होती. एक व्यक्ती विरुद्ध विश्व असा हा लढा होता. त्याची अपूर्वता ही आहे.
 टिळक आणि आगरकर यांची तुलना केली म्हणजे ही अपूर्वता नीट ध्यानात येईल. टिळकांनी सर्व जन्म ब्रिटिश साम्राज्याशी लढा करण्यात वेचला. त्य