पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१९
समारोप
 

काल व ब्रिटिश काल असे चार विभाग पडतात, हे मागे सांगितलेच आहे. यांतील पहिला काल स्वातंत्र्याचा, पराक्रमाचा, विद्या, कला, व्यापार यांच्या उत्कर्षाचा काल आहे. या सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने मोठे वैभव निर्माण केले होते. त्यातील विद्येच्या क्षेत्रात मात्र थोडी उणीव दिसते. तेथे तक्षशिला, नालंदा येथल्यासारखे एकही विद्यापीठ स्थापन झाले नाही. पण त्याहून जास्त खटकणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात आर्यभट, वराहमिहिर, लल्ल, ब्रह्मगुप्त यांसारखा गणित, ज्योतिष या क्षेत्रांत एकही पंडित झाला नाही. तक्षशिला, नालंदा येथे पारलौकिक विद्येबरोबर ऐहिक विद्येचाही अभ्यास होत असे. तसा अभ्यास महाराष्ट्रात झाला नाही. ऐहिक विद्येचा खरा अभ्यास महाराष्ट्रात ब्रिटिश काळातच झाला. तोपर्यंत महाराष्ट्र या बाबतीत मागेच राहिला.
 दुसरा कालखंड हा बहामनी कालखंड होय. हा पूर्ण पारतंत्र्याचा काल होय. यातील दुर्देव हे की ब्राह्मण पंडित व मराठा सरदार हे जे समाजाचे नेते ते या काळात यवनसेवेतच धन्यता मानीत असत. स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे हे येथील ब्राह्मण पंडितांना कधी कळलेच नाही. इतकेच नव्हे तर गीता, महाभारत यांचे वाचन करणाऱ्या या विद्वानांना धर्म म्हणजे काय हे जाणण्याची पात्रता सुद्धा कधी आली नाही. मराठा सरदारांची अशीच त्यांच्या क्षेत्रात अवनती झाली होती. तीनशे वर्षे हे सरदार मुस्लिम सत्ताच वृद्धिंगत करीत राहिले. स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रयत्नसुद्धा यांपैकी कोणी केला नाही, हे फार खेदकारक होय.
 यानंतरचा काल म्हणजे मराठा काल होय. या कालाचे मुख्य वैभव म्हणजे मुस्लिम सत्तेचे निर्दाळण हे होय. तो काळ असा होता की मराठे उभे राहिले नसते तर सर्व हिंदुस्थान यवनाक्रांत होऊन हिंदुधर्म नामशेष झाला असता. अशा वेळी शिवछत्रपतींचा उदय झाला व त्यांच्या प्रेरणेने मराठ्यांच्या स्वराज्याची व पुढे साम्राज्याची स्थापना झाली. हिंदुस्थानचे व हिंदुत्वाचे रक्षण हे मराठ्यांचे अलौकिक कर्तृत्व होय यात शंका नाही. पण हे उभारलेले वैभव कायम टिकविण्याची कोणतीही विद्या मराठ्यांनी जोपासली नाही. रणातील पराक्रमामागे जे दुर्भेद्य असे ऐक्य, जी एकजूट लागते, तीही त्यांना साधली नाही. याशिवाय राजसत्तेला पोषक असे जे वनोत्पादन, व्यापार, शेती यांकडेही त्यांनी लक्ष दिले नाही. इंग्रजांचे सर्व कर्तृत्व हे मराठे तीनशे वर्षे पाहत होते. पण त्यांची राजनीती, संघभावना, युद्धशास्त्र, समुद्रपर्यटन, व्यापार, कारखानदारी, यांचे आकलनसुद्धा त्यांना झाले नाही. यामुळेच मुस्लिम सत्ता नष्ट करण्यात जरी ते यशस्वी झाले तरी इंग्रजांपुढे ते टिकाव धरू शकले नाहीत.
 मराठी राज्यात कोणी लेणी कोरली नाहीत, दक्षिणेतल्यासारखी भव्य मंदिरे उभारली नाहीत, संगीत, नाट्य, चित्र, शिल्प या कलांची उपासना केली नाही आणि राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांचा अभ्यासही केला नाही.
 त्या दृष्टीने पाहता ब्रिटिश काल हा पारतंत्र्याचा काल असूनही त्याचे वैभव निश्चितच श्रेष्ठ वाटते. आणि याचे कारण एकच, प्रारंभापासूनच महाराष्ट्राने स्वातंत्र्याकांक्षा धरून