पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८११
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

अग्रगण्य होत.
 पण असे असूनही मराठी चित्रपटसृष्टी आता निष्प्रभ होत चालली आहे असे जाणकार म्हणतात. हिंदी चित्रपटांत हाणामाऱ्या, हीन भावनांना आवाहन, कमालीची कृत्रिमता यांचा हैदोस मुरू आहे. त्यांच्याशी स्पर्धा करताना मराठी चित्रपट टिकत नाहीत. म्हणून त्यांनीही आपली पायरी सोडून खाली उतरायला सुरुवात केली आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.

नृत्य : प्राचीन परंपरा
 आता नृत्यकलेचा विचार करू. भारतामध्ये वेदकालापासून किंवा कदाचित त्याच्याही पूर्वीपासून नृत्यकलेचा शास्त्रोक्त अभ्यास होत असे, असे दिसते. वेद, ब्राह्मणे या ग्रंथांत नृत्याचे उल्लेख आहेत व त्याचा महिमाही वर्णिला आहे. यज्ञप्रसंगी नृत्य करण्याची प्रथा होती. शिव आणि पार्वती या दोन देवता तांडव आणि लास्य (नाजूक नृत्य) यांसाठी प्रसिद्ध आहेत. गंधर्व आणि अप्सरा या जमातींची नृत्यगायनासाठीच कीर्ती आहे. ऊर्वशी, मेनका, रंभा, तिलोत्तमा या इंद्राच्या नृत्यांगनांचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. नृत्यावरचा पहिला शास्त्रीय ग्रंथ 'नटसूत्रे' हा होय. शिलाली या पंडिताने तो इ. स. पूर्व ५०० च्या सुमारास लिहिला. त्यानंतरचा ग्रंथ म्हणजे नंदिकेश्वराचा 'भरतार्णव' होय. भरताच्या 'नाट्यशास्त्रा'त प्रामुख्याने नाटकाचेच विवेचन असले तरी नृत्याचाही विचार त्यात सविस्तर केला आहे. पुराणांमध्ये विष्णुधर्मोत्तर पुराण व अग्निपुराण यांनी नृत्यकलेची चर्चा केली आहे. शार्ङ्धराच्या 'संगीत रत्नाकरा'तही नृत्यकलेचे विवेचन आढळते. त्यानंतर सर्वच क्षेत्रांत ऱ्हासकाळ आला, तसाच तो नृत्यकला व तीवरील ग्रंथ यांनाही आला.
 महाराष्ट्रातील नृत्यकलेचा विचार सातवाहन ते यादव या कालखंडातील एका प्रकरणात केलाच आहे. त्या काळी नृत्य-संगीताला राजाश्रय तर होताच, पण अनेक राजस्त्रियाही स्वतः नृत्यकुशल होत्या. शिवाय वेरूळ, अजंठा येथील कोरीव लेण्यांत अनेक नृत्यमूर्ती आढळतात. यावरून त्या काळी ही कला किती महत्त्व पावली होती, ते कळून येते.
 मुसलमानी आक्रमणानंतर या कलेचा ऱ्हास झाला. ठाकूर, कातकरी, भिल्ल इ. आदिवासी जमाती फेर धरून नृत्य करतात हे खरे, पण ते ठरीव आणि साचेबंद असून त्यात आत्माविष्कार व भावनाविष्कार नसल्यामुळे तिला नृत्यकला म्हणता येत नाही. स्त्रियांच्या फुगड्या, झिम्मा इ. खेळांचा दर्जा जरा वरचा आहे. पण तीही कला नव्हे. मराठा कालात तमाशात नृत्य केले जात असे. पण, रोहिणी भाटे यांच्या मते, त्याची पातळी आणखी वरची असली तरी ती कला नव्हे.
 आज कथ्थक, मणिपुरी, भरतनाट्य व कथाकली अशा चार नृत्यपरंपरा भारतात अभ्यासल्या जात आहेत. या विशिष्ट पद्धती तेराव्या शतकानंतर वेगळ्या झाल्या व