पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०५
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

हरकत नाही.

गद्य रंगभूमी
 संगीत रंगभूमीचा असा विकास होत असताना गद्य रंगभूमीनेही आपले कार्य तितक्याच जिद्दीने चालविले होते. पण एक गोष्ट खरी की महाराष्ट्राने संगीत नाटकांना जो पुरस्कार दिला तसा गद्य नाटकांना दिला नाही. एका अर्थाने संगीताने नाटकातील समरप्रसंगाचा वेग, अभिनय यांची हानी होते. गद्य नाटकात हे होत नसल्यामुळे खरे नाट्य तेथेच पाहावयास मिळते. तरी मराठी जनतेने उचलून धरले ते संगीत रंगभूमीलाच. अशाही स्थितीत गद्य रंगभूमीने जे यश मिळविले तेच जास्त होय असे म्हटले पाहिजे. १८८० सालीच शंकरराव पाटकर व देवल यांनी 'आर्योद्धारक' नाट्यसंस्था स्थापन केली. ती फार दिवस चालली नाही. पण तिच्या परंपरेतूनच 'शाहू नगरवासी' या गद्य नाटक मंडळीची स्थापना झाली. या मंडळीने 'हॅम्लेट', 'मानाजीराव', 'झुंझारराव', 'त्राटिका' ही शेक्सपियरची अनुवादित नाटके, 'तुकाराम', 'नामदेव' ही संतचरित्रावरची नाटके व 'राणा भीमदेव' हे वीररसप्रचुर नाटक रंगभूमीवर आणले. यातील गणपतराव जोशी यांची कीर्ती त्यांच्या हॅम्लेटच्या भूमिकेमुळे अमर झाली आहे. गणपतराव जोशी व हॅम्लेट ही नावे महाराष्ट्रात एकरूपच झाली आहेत. बाळाभाऊ जोग हे असेच असामान्य नट होते. अभिनयाच्या गुणांमुळे त्यांनी नायिकांच्या भूमिकांतून गणपतरावांच्या बरोबरीने यश मिळविले होते. सतत तीस वर्षे या जोडीने गद्य रंगभूमीवर अद्वितीय असे कर्तृत्व करून दाखविले.

महाराष्ट्र नाटक मंडळी
 १९०४ मध्ये 'महाराष्ट्र नाटक मंडळी' ही दुसरी गद्य मंडळी स्थापन झाली. तिला 'कीचकवध', 'भाऊबंदकी' इ. खाडिलकरांची नाटके लाभल्यामुळे एकदम कीर्ती मिळाली. कारखानीस, टिपणीस बंधू, त्र्यंबकराव प्रधान व गणपतराव भागवत हे या यशाचे प्रमुख मानकरी होते. हॅम्लेट व गणपतराव जोशी हे जसे एकरूप झाले होते तसेच कीचक व भागवत एकरूप झाले होते. त्या वेळी त्यांनी सारा महाराष्ट्र भारून टाकला होता. याच परंपरेत पुढे गणपतराव बोडस, नानासाहेब फाटक, चिंतामणराव कोल्हटकर, दिनकर कामण्णा, भांडारकर या नटांनी अलोट कीर्ती मिळविली. 'बेबंदशाही', 'शिवसंभव', 'कृष्णार्जुनयुद्ध', 'विचित्र लीला', 'चंद्रग्रहण', 'हाच मुलाचा बाप' ही गद्य नाटके त्या वेळी खूपच यशस्वी झाली. त्यांतील प्रमुख कलाकार केशवराव दाते, पोतनीस, नानबा गोखले, टिपणीस बंधू हे होत. यांत केशवराव दाते हे अग्रगण्य होत. त्यांचे अभिनयनैपुण्य लोकोत्तर होते. पुढे चित्रपटांतही त्यांनी याच गुणामुळे अलौकिक यश मिळविले.