पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५५
मरहट्ट सम्राट सातवाहन
 



महाराष्ट्रीय घराणे
 सातवाहन हे महाराष्ट्रीय की आंध्र आणि त्यांचे मूळस्थान कोणते हा वादाचा पहिला प्रश्न आहे. पुराणात या वंशाला आंध्र म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे शिलालेख व नाणी यांचा शोध लागेपर्यंत हे आंध्रप्रदेशीय म्हणजे तेलंगणातले राजघराणे आहे व त्याचे मूळस्थान त्या प्रदेशातले आहे असा समज रूढ होता. पण शिलालेख व नाणी उपलब्ध झाल्यावर सर्वच चित्र पालटले. त्यावरून असे दिसून आले की कोणत्याही शिलालेखात वा नाण्यावर सातवाहन स्वतःला आंध्र म्हणवीत नाहीत. पुराणांखेरीज चुकूनसुद्धा त्यांना कोठे आंध्र म्हटलेले नाही. खारवेल, शक, कदंब यांचे हाथीगुंफा, गिरनार, तलगुंडा येथे शिलालेख आहेत. त्यांतही 'सातवाहन' असेच या वंशाला म्हटलेले आहे, आंध्र म्हटलेले नाही. दुसरे असे की सातवाहनांचे प्रारंभीचे सर्व शिलालेख नाशिक, कार्ले, नाणेघाट, कान्हेरी या महाराष्ट्रातील गावी सापडले आहेत. त्यांच्या साम्राज्याच्या अगदी उत्तर काळातील फक्त चार शिलालेख आंध्रप्रदेशात आहेत. प्रारंभीची नाणी सापडली तीही सर्व पश्चिम हिंदुस्थानातच सापडली. वसिष्ठीपुत्र पुलुमायी याचा शिलालेख व याची नाणी आंध्रप्रांतात आहेत. हा उत्तरकालीन राजा होय. यांवरून पंडितांनी असा निष्कर्ष काढला आहे की पुराणे लिहिली गेली त्या काळी सातवाहनांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट होऊन त्यांची सत्ता आंध्रप्रदेशातच शिल्लक राहिली होती; तेवढ्यावरून पुराणांनी त्यांना आंध्र ठरविले असावे. वास्तविक ते मूळचे महाराष्ट्रीय होत.

भाषा
 सातवाहन हे महाराष्ट्रीय होत, असे म्हणण्यास दुसरा महत्त्वाचा पुरावा म्हणजे त्यांची भाषा होय. त्यांचे सर्व शिलालेख महाराष्ट्री भाषेत आहेत. त्यांचा एकही लेख द्रविडी भाषेत नाही शिवाय हालसातवाहनाचा गाथासप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्रीमध्ये आहे. राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत, सातवाहन हा राजा कुंतलप्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो, असा उल्लेख केला आहे. हा भाषेचा पुरावा महत्त्वाचा आहे. त्यावरून सातवाहनांचे महाराष्ट्रीयत्व निश्चित सिद्ध होते.
 कलिंगराज खारवेल याने सातकर्णीवर स्वारी केली होती. हाथीगुंफा येथील शिलालेखात तिचा उल्लेख असून त्या वेळी त्याने आपले सैन्य पश्चिमेला धाडले असे म्हटले आहे. कलिंगाच्या पश्चिमेस महाराष्ट्र येतो. आंध्र दक्षिणेला आहे. सातकर्णी आंध्रात असता तर सैन्य दक्षिणेला धाडले असे म्हटले असते. 'लीलावई' या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान (पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट स्त्रिया होत्या असे वर्णन केले आहे.