पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
५४
 



सातवाहन - मूळ पुरुष
 महाराष्ट्राच्या विश्वसनीय इतिहासास सातवाहनांच्या राजसत्तेपासूनच प्रारंभ होतो ही राजसत्ता सातवाहननामक पुरुषाने इ. स. पूर्व २३० च्या सुमारास स्थापन केली. पुराणात या राजवंशाची माहिती दिली आहे. ती ढोबळ मानाने पुष्कळ बरोबर आहे. पण अलीकडे स्वतः सातवाहनांची सहस्रावधी नाणी व अनेक शिलालेख सापडले आहेत. त्यांच्या आधारे त्यांच्या इतिहासातील घटनांना पुष्कळसे निश्चित रूप देणे शक्य झाले आहे. पुराणान्वये शिशुक किंवा शिनुक हा सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष होता. पण अलीकडे सातवाहन या पुरुषाचे नाव असलेलीच नाणी सापडली आहेत त्यावरून सातवाहन हाच या राजवंशाचा मूळ पुरुष होय व त्याच्यावरून या वंशाला हे नाव पडले, असा सिद्धांत म. म. वा. वि. मिराशी यांनी मांडला आहे. (संशोधन मुक्तावली -सर २ रा, पृ. ६४.) त्यामुळे या वंशाला सातवाहन हे नाव कसे पडले असावे याविषयीच्या आतापर्यंतच्या सर्व उपपत्ती काल्पनिक ठरून रद्द झाल्या आहेत. प्रा. मिराशी यांच्या मते सिमुक हा सातवाहन या मूळ संस्थापकाचा नातू असावा. म्हणजे जुन्या कल्पनेप्रमाणे सातवाहनांचा जो आरंभकाळ ठरतो त्याच्या मागे दोन पिढ्या तो न्यावा लागतो.
 सातवाहनांच्या प्रारंभकाळाबद्दल अनेक वाद आहेत, त्याचप्रमाणे हे घराणे महाराष्ट्रीय की आंध्र, वर्णाने ते ब्राह्मण, क्षत्रिय, की शूद्र, शालिवाहनशकाशी त्यांचा संबंध जोडणे कितपत युक्त आहे, या घराण्यात मातृवंशपरंपरा होती काय याबद्दलही खूप वाद आहेत. या वादामध्ये डॉ. रा. गो. भांडारकर ( अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन ), डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ व २), डॉ. सुखटणकर (दि होम ऑफ दि सो कॉल्ड आंध्र किंग्ज, भांडारकर इन्स्टिटयूट, व्हॉ १, सुखटणकर मेमोरियल एडिशन, पृ. २५१), स. आ. जोगळेकर ( गाथासप्तशती - प्रस्तावना आणि दि होम ऑफ दि सातवाहनाज्, ॲनल्स् ऑफ भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, सिल्व्हर ज्युबिली व्हॉल्यूम, १९१७-४२, पृ. १९६ ), डॉ. के. गोपाळाचारी (अर्ली हिस्टरी ऑफ दि आंध्र कंट्री आणि कांप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २ रा, प्रकरण १० वे ), डॉ. डी. सी. सरकार ( दि हिस्टरी अंड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल, खंड २ रा, भारतीय विद्याभवन - मुंबई, प्रकरण १३ वे ), विद्या- सागर बखले ( राजवाडे व शालिवाहन राजे, विविध ज्ञानविस्तार, मार्च व डिसें. १९२७ ), महामहोपाध्याय वा. वि. मिराशी ( संशोधन मुक्तावली, सर १ ला व २ रा ) अशा मोठमोठ्या पंडितांनी भाग घेतला आहे. या वादाचा तपशील येथे देण्याचा विचार नाही. वरील प्रश्नासंबंधी मला जे निष्कर्ष ग्राह्य वाटले ते त्यांच्या कारणांसह येथे द्यावे व बाकीच्यांचा जरूर तेथे फक्त निर्देश करावा असे धोरण मी अंगीकारले आहे. ज्यांना मूळ वादात शिरावयाचे आहे त्यांनी कृपया मूळ ग्रंथ पाहावे.