पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९१
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 

 शास्त्राबरोबरच रंजन व रसपरिपोष करणारी व करुण भावना आंदोलित ठेवणारी करीम खां यांची गायकी एकदम महाराष्ट्राच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेली. महाराष्ट्राला हा एक नवा ठेवाच सापडला. एक काळ असा होता की कोणत्याही उत्सवात किराणा घराण्याचाच गायक बोलविला जाई. इतकी महाराष्ट्रावर अब्दुल करीम खां यांची छाप पडली होती. पुण्याला खांसाहेबांनी 'आर्य संगीत विद्यालय' स्थापिले आणि नंतर मुंबईला त्याची झाखा काढली. तेथील विद्यार्थ्याचा सर्व खर्च विद्यालयच चालवी. जलसे करून त्यांवर पैसा मिळवून खांसाहेब तो यावर खर्च करीत. रामभाऊ कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व, सुरेशबाबू माने, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, रोशन आरा बेगम, शंकरराव सरनाईक हे सर्व त्यांचेच शिष्य होत. भीमसेन जोशी व गंगूबाई हनगल यांनी किराणा घराण्याचीच परंपरा पुढे चालविली आहे. महाराष्ट्रात 'ग्वाल्हेर' घराण्याच्या खालोखाल 'किराणा' घराण्याचाच प्रसार आहे. वर सांगितल्याप्रमाणे किराणा घराण्याला मिरज घराणे म्हणावे इतके अब्दुल करीमखां महाराष्ट्राशी एकरूप झाले होते.
 महाराष्ट्राचा संगीताबद्दल जो एवढा लौकिक झाला त्यात रामकृष्णबुवा वझे यांचाही मोठा वाटा आहे. इंदूर, ग्वाल्हेर, उज्जैन येथे अपार कष्ट सोसून, दारिद्र्य, दुःख, मानहानी सोसून त्यांनी अनेकांकडून गायनविद्या मिळविली. त्यांनी शागिर्दी केली ती ग्वाल्हेर घराण्याची. बाळकृष्णबुवा, पंडित विष्णू दिगंबर हे याच घराण्याचे. पण वझेबुबांनी इतर अनेक गायकांकडूनही चिजा व राग घेऊन एक स्वतंत्र पद्धती निर्माण केली. ते नेपाळात काही दिवस दरबारी गायक म्हणून होते. तेथे लखनौ घराण्याचे गायक हुसेन खां, वीणावादक सादिक अली खां यांचा त्यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यापासूनही बुवांनी असंख्य ठुमऱ्यांचा साठा मिळविला.
 महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी मुक्त हस्ताने सर्वाना आपली विद्या दिली. 'ललित कलादर्श' व 'बलवंत संगीत मंडळी' यांच्या अनेक नाटकांचे संगीत-दिग्दर्शन त्यांनी केलेले आहे. त्यातल्या काही चाली अजूनही महाराष्ट्राच्या ओठावर खेळत आहेत. व्हायोलिन व सतार या दोन्ही वादनांत बुवा निष्णात होते. त्यांचा शिष्यपरिवारही मोठा होता. केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर, मास्टर दीनानाथ, चाफेकर, कागलकरबुवा इ. बुवांचे शिष्य नामवंत झाले. बुवांनी आपल्या अनेक चिजा नोटेशन सह 'संगीत कलाप्रकाश' या नावाच्या पुस्तकात प्रसिद्ध केल्या आहेत.
 उत्तरेतून येऊन संपूर्णपणे महाराष्ट्रीय झालेले दुसरे थोर गायक म्हणजे अल्लादिया खां हे होत. १८९३ साली ते येथे आले, ते मृत्यूपर्यंत म्हणजे १९४६ पर्यंत येथेच राहिले. कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या दरबारी ते चोवीस वर्षे होते. आणि त्यानंतर २०-२२ वर्षे मुंबईस होते. महाराष्ट्राने त्यांचा पराकाष्ठेचा गौरव केला. कोणी त्यांना 'संगीतसूर्य' म्हटले, कोणी 'संगीतभगीरथ' म्हटले. बॅ. जयकर त्यांना गायन कलेतील गौरीशंकर म्हणत. या सर्व गौरवाला पात्र अशीच त्यांची कला होती.