पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७८६
 

 अलीकडच्या काळातील पहिले आत्मचरित्र म्हणजे दादोबा पांडुरंग यांचे. ते त्यांच्या वैयक्तिक माहितीपेक्षा त्यांच्या काळाच्या माहितीच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातले ख्रिस्ती धर्मप्रचारक बाबा पदमनजी यांनी १८८४ साली आत्मचरित्र लिहिले. वासुदेव बळवंत फडके यांचे आत्मचरित्र त्यांच्या आशाआकांक्षा समजण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
 महर्षी धोंडो केशव कर्वे, धर्मानंद कोसंबी, सी. म. देवधर, माधवराव बागल आणि कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे या सर्वांनी आत्मचरित्रे लिहिली आहेत. हे सर्व समाजसुधारक होते. यांची चरित्रे वाचून तत्कालीन समाजसुधारणेचा सर्व इतिहास डोळ्यांपुढे उभा राहतो. शिवाय समाजसुधारणेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोनही समजतो.
 स्वातंत्र्यवीर सावरकरांची, माझी जन्मठेप व त्यांचे आत्मवृत्त ही दोन्ही पुस्तके क्रांतिकारकांचे जीवन फार स्पष्टपणे समजावून देतात. न. चिं. केळकर, काकासाहेब गाडगीळ, ना. भा. खरे व ना. ग. गोरे हे सर्व राजकारणातील पुरुष- त्यांची आत्मचरित्रे त्या काळचा राजकीय इतिहास आपल्याला समजावून देतात.
 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, ल. रा. पांगारकर, ना. सी. फडके, ग. त्र्यं. माडखोलकर ना. गो. चापेकर, काका कालेलकर या साहित्यिकांनी आत्मचरित्रे लिहिली आहेत. श्री. म. माटे व प्र. के. अत्रे यांनी आत्मचरित्रे लिहिली ती जरा निराळ्या पद्धतीने. 'मी व मला दिसलेले जग' असा त्यांचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या काळच्या, त्यांच्या जीवनाशी संबद्ध अशा सामाजिक घटनांची माहिती मिळते. वि. द. घाटे यांचे आत्मचरित्र या दृष्टीने उद्बोधक झाले आहे. 'ही माझी जीवनकहाणी बाहेरच्या व आतल्या जीवनाची कहाणी आहे,' असे त्यांनीच म्हटले आहे. के. ना. वाटवे, कृ. पां. कुळकर्णी, कृ. भा. बाबर यांचीही आत्मचरित्रे अशाच पद्धतीची आहेत.
 कलाक्षेत्रातील गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव भोळे, ग. दि. माडगूळकर, सी. रामचंद्र, बाबूराव पेंढारकर यांची आत्मचरित्रे आपल्याला कलेच्या क्षेत्रात घेऊन जातात व त्या अपरिचित जगातली अनेक मर्मे उकलून दाखवितात.
 लक्ष्मीबाई टिळक, रमाबाई रानडे व पार्वतीबाई आठवले या स्त्रियांनी आत्मचरित्रे लिहिली आहेत. त्यातील लक्ष्मीबाईची 'स्मृतिचित्रे' मराठीत फार गाजली. रमाबाईंचे 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' याचेही, न्या. मू. रानडे यांचे स्वभावदर्शन घडविण्याच्या दृष्टीने आगळे महत्त्व आहे. पार्वतीबाईंचे आत्मचरित्र म्हणजे एका अशिक्षित स्त्रीने केवळ अंगच्या कर्तबगारीच्या बळावर केवढे स्थान प्राप्त करून घेतले त्याचे रोमहर्षक वर्णन आहे. कमलाबाई देशपांडे यांची 'स्मरणसाखळी' व लीलाबाई पटवर्धन यांची 'आमची अकरा वर्ष' ही दोन्ही आत्मचरित्रे उल्लेखनीय आहेत.