पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८५
विचारप्रधान साहित्य
 

ही चरित्रे त्यांनी लिहिली. ज. र. आजगावकर व न. र. फाटक यांनीही संतचरित्रे लिहिली आहेत. वरील चरित्रांची व जुन्या प्राचीन काळच्या चरित्रांची तुलना करून पहावी म्हणजे जुने व नवे चरित्रे यांतील फरक ध्यानात येईल.
 नंतरच्या काळात न. चिं. केळकर यांनी लिहिलेले टिळकांचे त्रिखंडात्मक चरित्र, न. र. फाटक यांनी लिहिलेले रानडे यांचे चरित्र, हवालदारांचे मंडलिकांचे चरित्र, शि. ल. करंदीकरांनी लिहिलेले सावरकरांचे चरित्र, जांभेकरांचे बाळशास्त्री यांचे चरित्र ही सर्व चरित्रे नव्या चिकित्सेने लिहिलेली आहेत. गांधीयुगात नेहरू, मालवीय, सुभाषचंद्र व खुद्द महात्माजी यांची चरित्रे प्रसिद्ध झाली. यात दा. न. शिखरे यांनी लिहिलेले महात्माजींचे चरित्र विशेष उल्लेखनीय आहे. निःपक्षपाती व तटस्थ वृत्तीने हे लिहिलेले असल्यामुळे चरित्रग्रंथांत त्याला आगळे स्थान आहे.
 साहित्यिकांची चरित्रे 'चरित्र व वाङ्मय विवेचन' या नावाने प्रसिद्ध होतात. तशी फडके, खांडेकर, हरिभाऊ आपटे, अत्रे, वा. म. जोशी, गडकरी यांची चरित्रे मराठीत प्रसिद्ध झाली आहेत. गं. दे. खानोलकर यांचे या क्षेत्रातील कार्य विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी आरंभापासून आतापर्यंतच्या सर्व साहित्यिकांची चारत्रे एकंदर चार खंडांत प्रसिद्ध केली आहेत. त्यामागचे परिश्रम व त्यांची चिकित्सक दृष्टी ही पदोपदी वाचकांना जाणवते.
 याच काळात दादाभाई नौरोजी, न्या. मू तेलंग, आगरकर, गोखले, काव्हूर, गॅरिबाल्डी, मॅझिनी, नेपोलियन, लेनिन, माओ, मार्क्स या देशीविदेशी थोर पुरुषांची चरित्रे लिहिली गेली. त्यांतील भावे यांचे नेपोलियनचे चरित्र उल्लेखनीय आहे. चरित्रलेखनाचा तो आदर्श आहे असे मानले जाते.
 चरित्रवाङ्मयाला इतिहासाइतकेच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्व आहे. त्यात इतिहास तर येतोच; पण थोर व्यक्तींचे आदर्श, जे इतिहासात तपशिलाने पहावयास मिळत नाहीत, ते चरित्रात मिळतात. त्या दृष्टीने चरित्रवाङ्मय हे समाजाचे मोठे धन आहे, असे म्हटले पाहिजे.
 चरित्राइतकेच आत्मचरित्राला महत्व आहे. त्यातही इतिहास असतोच. पण तो व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आलेला असतो. त्यातून काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते. स्वतःच्या अनेक कृत्यांचे, वागणुकीचे, मतांचे समर्थन असे पुष्कळ वेळा आत्मचरित्राला रूप येते. पण हा दोष पत्करूनही व्यक्तीच्या जीवनाचे अंतरंग समजण्याच्या दृष्टीने व भिन्न व्यक्ती समाजाकडे, परिस्थितीकडे, घटनांकडे कोणत्या दृष्टीने पाहतात हे समजण्याच्या दृष्टीने आत्मचरित्र- वाङ्मयाला महत्त्व आहे.
 मराठीत पूर्वी आत्मचरित्र लिहिण्याची प्रथा नव्हती. संत तुकारामांनी स्वतः विषयी थोडी माहिती लिहिली आहे. पण ती अगदी त्रोटक, सातआठ अभंगांतच आहे. नाना फडणिसांनी आत्मचरित्र लिहिले आहे. ते मात्र विस्तृत असे आहे. गंगाधरशास्त्री पटवर्धन यांनीही आत्मचरित्र लिहिले आहे. हे जुन्या काळाविषयी झाले.

 ५०