पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७७
विचारप्रधान साहित्य
 

 त्र्यंबक शंकर शेजवलकर हे मराठीतले एक ख्यातनाम लेखक आहेत. त्यांनी शिवचरित्र लिहिण्याचा संकल्प केला होता. पण ते लिहून झाले नाही. पण त्याची प्रस्तावना जी त्यांनी लिहिली आहे तो एक स्वतंत्र प्रबंधच झाला आहे. त्यात शिवचरित्राची पार्श्वभूमी आणि महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग यांचे त्यांनी केलेले विवेचन अत्यंत उद्बोधक झाले आहे. त्यावरून त्यांच्या दीर्घ व गाढ व्यासंगाची कल्पना येते. त्यांच्या स्फुट निबंधांचा एक संग्रहही प्रसिद्ध झाला आहे.
 प्रा. गं. बा. सरदार हे महाराष्ट्राला थोर विचारवंत म्हणून परिचित आहेत. 'संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रुती', 'महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी', 'ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा' असे त्यांचे थोडेच साहित्य आहे. पण त्यांची व्याख्याने फार विचार- परिप्लुत असतात. समाजशास्त्र, धर्म, साहित्य या सर्व विषयांत त्यांना सहज गती आहे. त्यांचे वाचन चौफेर आहे आणि त्यामुळेच त्यांची व्याख्याने अगदी मौलिक अशी होतात.
 ना. ग. गोरे हे व्यासंगी लेखक आहेत. त्यांचा व्यासंग बहुविध आहे. य. गो. जोशी यांच्या मालेत त्यांनी 'विश्वकुटुंबवाद' हे पुस्तक लिहिले. कृष्णाकाठची वर्णनेही ते करतात. आणि समाजवादावर व एकंदर राजकारणावरही ते लेखणी चालवितात. विद्वत्तेप्रमाणेच लालित्यानेही त्यांचे लेखन अलंकृत झालेले असते.
 डॉ. इरावती कर्वे या मुख्यतः संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. मानववंशशास्त्र हा त्यांचा विषय. 'मराठी लोकांची संस्कृती' हा त्यांचा ग्रंथ याच दृष्टिकोणातून लिहिलेला आहे. 'परिपूर्ती' हा त्यांचा निबंधसंग्रह होय. 'युगांत' नावाचा त्यांचा महाभारतावरचा ग्रंथ विशेष गाजला होता. 'हिंदुसमाज- एक अन्वयार्थ', व 'महाराष्ट्र- एक अभ्यास' असे दोन प्रबंधही त्यांनी लिहिलेले आहेत.
 काकासाहेब तथा न. वि. गाडगीळ हे काँग्रेसचे एक खंदे पुढारी होते. मंत्री, राज्यपाल इ. अनेक अधिकारपदे त्यांनी भूषविली होती. हा सर्व व्याप संभाळून त्यांनी 'ग्यानबाचे अर्थशास्त्र', 'राज्यशास्त्र विचार', 'घटनाप्रबोधिनी' असे अर्थशास्त्र व राजकारण या विषयांवर ग्रंथ लिहिले. 'माझे समकालीन', 'अनगड मोती', 'त्याचा यळकोट राहिना' हे त्यांचे लेखसंग्रह आहेत. त्यांत काही चरित्रवजा व काही लघु- निबंधवजा असे लेख आहेत.
 दुर्गाबाई भागवत या समाजशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसाहित्य हा त्यांचा अभ्यासाचा खास विषय आहे. त्यावर 'लोकसाहित्याची रूपरेखा' हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. 'ऋतुचक्र' हे त्यांचे पुस्तक फार प्रसिद्ध आहे. मेघश्याम आषाढ, सोनेरी अश्विन ही त्यातील प्रकरणे विशेष रम्य आहेत. 'व्यासपर्व' हा त्यांचा ग्रंथ महाभारताविषयी आहे. श्रीकृष्ण, द्रौपदी, दुर्योधन इ. प्रमुख व्यक्तींच्या कार्याचे विवेचन त्यात केलेले आहे.