पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७७८
 

 तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक प्रकांड पंडित आणि श्रेष्ठ विचारवंत आहेत. पाश्चात्य व पौर्वात्य, प्राचीन व अर्वाचीन सर्व शास्त्रांत त्यांची गती अकुंठित आहे. 'हिंदुधर्माची समीक्षा' व 'वैदिक संस्कृतीचा विकास' हे त्यांचे दोन ग्रंथ याची साक्ष देतील. त्यांच्यावर एकेकाळी मार्क्सवादाचा फार प्रभाव होता, हे पहिल्या ग्रंथावरून दिसून येते. पण पुढे त्यांचे मतपरिवर्तन झाले. वैचारिक मूल्यांचा प्रभाव समाजातील भौतिक जड परिस्थितीवरही पडतो, हे त्यांना पुढे मान्य झाले. दुसरा ग्रंथ याच दृष्टिकोनातून लिहिलेला आहे.
 डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे हेही पाश्चात्य- पौर्वात्य शास्त्रांचे अभ्यासक आहेत. विज्ञान- प्रणीत समाजरचना' व 'स्वभावलेखन' हे त्यांचे प्रारंभीचे ग्रंथ होत. १९४२ सालापासून ते 'वसंत'मध्ये लिहीत आहेत. जगातील लोकशाही शासनांची त्यांनी सविस्तर चिकित्सा या लेखांत केली आहे. 'भारतीय लोकसत्ता', लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान', 'हिंदुसमाज संघटना- विघटना', 'इहवादी शासन', 'केसरीची त्रिमूर्ती' हे त्यांचे ग्रंथ होत. आणि 'माझे चिंतन, वैयक्तिक आणि सामाजिक', 'पराधीन सरस्वती', 'राजविद्या' हे त्यांचे निबंधसंग्रह होत. पण प्रारंभीचे ग्रंथ वगळता पुढले सर्व साहित्य १९५४ नंतरचे आहे.
 बाळशास्त्री हरदास हे प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे गाढ अभ्यासक होते. वेद, महाभारत, रामायण, भागवत यांचा अभ्यास करून त्यावर, सर्व भारतात, ते व्याख्याने देत असत. ही व्याख्याने पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली. 'वेदांतील राष्ट्रदर्शन' हा त्यांचा द्विखंडात्मक ग्रंथ त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतो. महाभारत, रामायण, भागवत, शिवछत्रपती यांवरील त्यांची व्याख्याने व ग्रंथ याचेच प्रत्यंतर देतात.
 रा. चिं. ढेरे, नरहर कुरुंदकर, वि. स. वाळिंबे, शिवाजीराव भोसले, डॉ. प्र. न. जोशी हे अलीकडच्या काळातील मोठे निबंधग्रंथकार होत. थोड्याच अवधीत त्यांनी मोठा लौकिक मिळविला आहे.
 मराठी निबंधग्रंथसाहित्य असे मोठे समृद्ध आणि वैभवशाली आहे. गेल्या शंभर सवाशे वर्षांत महाराष्ट्रात जे धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक परिवर्तन झाले त्याचे बव्हंशी श्रेय या साहित्यालाच आहे. ग्रंथ हे लोकांचे गुरू आहेत असे म्हणतात; पण वरील वर्णनावरून ते नुसते गुरूच नसून समाजातील अनेक घटनांचे प्रवर्तक, चालक व नेते आहेत, असे दिसून येते. निबंधमाला, गीतारहस्य अशा ग्रंथांची तर समाजमनावर दीर्घकाल सत्ता चालते. आणि राजे, महाराजे, दण्डसत्ताधारी, राष्ट्राध्यक्ष यांच्या सत्तेपेक्षा ही सत्ता लाखपटीने जास्त हितकर असते.

२. वृत्तपत्रे


 वृत्तपत्रे व नियतकालिके हे साहित्यही निबंध साहित्याइतकेच महत्त्वाचे आहे.