पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४१.
विचारप्रधान साहित्य
 



१. निबंध-ग्रंथ



 विचारप्रधान वाङ्मयात निबंध ग्रंथ या प्रकाराला अग्रस्थान आहे. निबंध हा अत्यंत प्रभावी असा वाङ्मय प्रकार आहे. समाजाच्या जीवनाशी, राष्ट्राच्या उत्कर्षापकर्षाशी त्याचा निकटचा संबंध आहे. नाटक, कादंबऱ्या, काव्य, लघुकथा यांचा समाजोन्नतीशी कितपत संबंध आहे, याविषयी वाद असू शकेल. पण निबंधाविषयी असा वाद असूच शकणार नाही. येथे निबंध हा शब्द व्यापक अर्थाने वापरला आहे. तर्कशुद्ध रीतीने केलेली, बुद्धीला आवाहन करणारी, आपले सिद्धांत साधार, सप्रमाण मांडणारी, इतिहास, अनुभव, अवलोकन यांच्या पायावर उभारलेली विचारप्रधान रचना, असा याचा अर्थ येथे अभिप्रेत आहे. ही रचना वीसपंचवीस पृष्ठांपर्यंत असली तर हल्ली आपण तिला निबंध म्हणतो. तीनचारशे पृष्ठांपर्यंत असली तर तिला ग्रंथ म्हणतो. प्रबंध हा शब्द अलीकडे रूढ होत आहे. हा प्रबंध याच्या कोठे तरी मध्ये बसेल. पण त्याची जाती याच प्रकारची आहे. तेव्हा येथे निबंध या शब्दात निबंध, प्रबंध, ग्रंथ या सर्वाचा समावेश केलेला आहे हे ध्यानी घ्यावे.
 असा हा निबंध आपल्याकडे १८३० नंतर म्हणजे ब्रिटिशकालातच अवतरला. पूर्वी मराठीतच काय पण संस्कृतमध्येही अशा तऱ्हेची रचना कोणी केलेली आढळत नाही. इतिहासदृष्टी जशी सर्व भारतीय इतिहासात आढळत नाही तशीच निबंधदृष्टीही आढळत नाही. ब्रिटिशकालात मात्र प्रारंभापासूनच निबंधकार दिसू लागतात.

 ४९