पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६७
मराठी ललित साहित्य
 

 १९२५ सालच्या सुमारास ना. सी. फडके व वि. स. खांडेकर यांनी लघुनिबंध लेखनास प्रारंभ केला. फडक्यांचे गुजगोष्टी, धूम्रवलये, अबोलीची फुले इ. लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत. खांडेकरांचे वायुलहरी, सायंकाळ, मंझधार हे संग्रह असेच प्रसिद्ध आहेत. या क्षेत्रातले तिसरे असेच मोठे लेखक म्हणजे अनंत काणेकर हे होत. त्यांचे विषय विचारात्मक आहेत. पण शैली अत्यंत खेळकर आहे. गणूकाका हे एक पात्र त्यांनी निर्माण केले आहे. त्याचा व लेखकाचा वादविवाद हे काणेकरांच्या लघुनिबंधांचे सामान्यतः स्वरूप असते. गणूकाका हे सनातनी व काणेकर हे आधुनिक. त्यामुळे या वादविवादांना रंगत चढते व लेखनाला सौंदर्य प्राप्त होते.
 यानंतर अनेक लेखकांनी हा वाङ्मयप्रकार हाती घेतला. त्यातील वि. पां. दांडेकर, ना. मा. संत, कुसुमावती देशपांडे, म. ना. अदवंत, कवी यशवंत, कुसुमाग्रज, र. गो. सरदेसाई ही नावे प्रसिद्ध आहेत. १९४५ नंतर दुर्गा भागवत, न. वि. गाडगीळ, गो. वि. करंदीकर, मंगेश पाडगावकर यांनी लघुनिबंधाच्या सौंदर्यात खूपच भर घातली. त्यामुळे हा वाङ्मयप्रकार अधिकाधिक रम्य होत गेला व त्याला काव्यात्म रूप आले.

दलित साहित्य
 'दलित साहित्य' असा एक मराठी साहित्याचा स्वतंत्र विभाग अलीकडे मानला जातो. तसे मानण्याला अर्थही आहे. म्हणून त्या वाङ्मयाचा थोडा परिचय करून घेऊ. प्रा. गंगाधर पानतावणे यांनी 'अमृत' मासिकात या विषयावर दहाबारा लेख, १९७५-७६ साली लिहून किसन फागू बनसोड, अण्णाभाऊ साठे, बंधू माधव, केरुबुवा गायकवाड इ. दलित लेखकांच्या साहित्याची उद्बोधक माहिती दिली आहे. डॉ. भालचंद्र फडके यांनी 'दलित साहित्य- वेदना आणि विद्रोह' या नावाचा ग्रंथच अलीकडे लिहिला आहे. अस्पृश्य व इतर हीन गणलेल्या जाती यांनी लिहिलेले साहित्य म्हणजे 'दलित साहित्य' होय. वरीलपैकी बनसोड वगळता बहुतेक लेखकांना डॉ. आंबेडकरांपासून, विशेषतः त्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्यानंतर, स्फूर्ती मिळालेली आहे. किसन बनसोड हे मात्र डॉ. आंबेडकरांच्या आधीचे होत. प्रा. पानतावणे यानी मालेच्या शेवटच्या लेखात डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचा परिचय करून दिला आहे.
 या सर्व साहित्यिकांनी हिंदुधर्म, हिंदुसमाज, त्यातील अस्पृश्यता, वर्णविषमता, जातिभेद यावर अत्यंत जहरी व जळजळीत टीका केली आहे. त्यांनी काव्य, लघुकथा, कादंबरी, नाटक सर्व प्रकारचे साहित्य लिहिले आहे. ते बहुतेक गेल्या वीस वर्षांतले आहे. बनसोड हे मात्र आधीपासून लिहीत आहेत. 'हा हिंद देश माझा' या कवितेत, हा देश जातिभेद, वर्णभेद मानतो, महारांना अस्पृश्यांना पशूपेक्षाही हीन समजतो, असा माझा हिंद देश आहे, अशी त्यांनी उपहासाने टीका केली आहे.
 प्रस्थापित रूढी, समाजरचना, वर्णव्यवस्था, विषमता यांविरुद्ध उठाव, यांवर टीकेचा भडिमार हे या दलित साहित्याचे मुख्य लक्षण होय. 'विद्रोहाचे पाणी पेटले