पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५९
मराठी ललित साहित्य
 

परिस्थितीशी त्याचा काही संबंध नाही. मराठीत कादंबरी साहित्याला खरा प्रारंभ केला तो हरिभाऊ आपटे यांनी 'आजकालच्या गोष्टी' असेच ते आपल्या कादंबऱ्यांना म्हणत असत. गणपतराव, मधली स्थिती, पण लक्षात कोण घेतो, मी, मायेचा बाजार, भयंकर दिव्य इ. दहा सामाजिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांतील 'पण लक्षात कोण घेतो' व 'मी' या मराठीत अमर झाल्या आहेत. कठोर वास्तववाद व थोर ध्येयवाद यांचे मोठे मधुर मिश्रण त्यांत पाहावयास मिळते. 'मी' म्हणजे जो भाऊ त्याचे जीवन प्रत्यक्ष आपल्याभोवती घडत आहे असे वाटावे, इतके ते वास्तववादी आहे आणि आजन्म ब्रह्मचारी राहून समाजसेवेला अर्पण करून घेण्याचा त्याचा ध्येयवाद उत्तुंग असा आहे. हरिभाऊंनी मध्यवर्गीय जीवनावरच सर्व कादंबऱ्या लिहिल्या. पण सर्व मानवी जीवनाचे हृदगत त्यांतून प्रकट झालेले आहे. स्वभावलेखन, सुलभ घरगुती भाषा, चटकदार संवाद, वेधक कथन ही साहित्याची सर्व भूषणे त्यांच्या कादंबऱ्यांतून दिसून येतात. हरिभाऊंच्या नंतरचे दुसरे मोठे कादंबरीकार म्हणजे वामन मल्हार जोशी हे होत. रागिणी, आश्रम हरिणी, नलिनी, इंदू काळे- सरला भोळे व सुशीलेचा देव या पाच कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांपैकी प्रत्येकीत प्रवृत्ती निवृत्ती, अध्यात्म, देव अशासारख्या विषयांवर गहन गंभीर, तात्त्विक चर्चा केलेली आहे. लालित्याकडे वामनरावांनी द्यावे तितके लक्ष दिलेले नाही. तरीही त्यांच्या कादंबऱ्या प्रारंभापासूनच लोकप्रिय झाल्या आणि त्यांना मराठीत अढळ असे स्थान मिळाले. तिसरे मोठे कादंबरीकर म्हणजे ना. सी. फडके होत. जादूगार, दौलत, उद्धार, अटकेपार या कादंबऱ्यांनी त्यांना अपार कीर्ती मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी ६०- ७० कादंबऱ्या लिहिल्या. पण त्यांच्या कादंबऱ्यांचा जो ठसा एकदा ठरून गेला तो गेला. पुढच्या कादंबऱ्यांत नावीन्य असे फारसे उरले नाही. पण कथानकाची रचना, स्वभावलेखन, प्रसंगनिर्मिती, भाषासौष्ठव, चित्तवेधक निवेदन, रहस्य इ. कलागुणांनी त्यांच्या कादंबऱ्या इतक्या संपन्न आहेत की मराठी भाषा त्यांची कायमची ऋणी राहील. खांडेकरांनी १९३० साली हृदयाची हाक ही पहिली कादंबरी लिहिली. त्या नंतर कांचनमृग, उल्का, दोन ध्रुव, हिरवा चाफा, पांढरे ढग, रिकामा देव्हारा, क्रौंचवध, ययाती इ. अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या नायकांच्या समोर नेहमी उत्तुंग ध्येयवाद असतो. दीनदलितांविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा त्यांच्या प्रत्येक कादंबरीत प्रकट होतो. ते जीवनवादी कलाकार आहेत. त्यावेळी जीवनवाद व कलावाद हा विषय फार चर्चिला जात होता. त्यातील पहिल्याचे खांडेकर व दुसऱ्याचे फडके हे अध्वर्यू होते. फडके-खांडेकरांच्या बरोबर ज्यांचे नाव नेहमी येते ते कादंबरीकार म्हणजे माडखोलकर हे होत. मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, शाप, कांता, दुहेरी जीवन, नागकन्या इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. 'विवाहित स्त्रीच्या जीवनात पतीच्या पत्नीद्रोहामुळे उत्पन्न होणारा एकच एक प्रश्न त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून विवेचिला आहे,' असे अ. ना. देशपांडे म्हणतात. क्रांतिकारकांबद्दल आकर्षण आणि